प्रतिनिधी /मडगाव
मडगाव शिवसेनेतर्फे हॉटेल रविराजमध्ये आयोजित कार्यक्रमात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य प्रमुख जितेश कामत उपस्थित होते. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. त्यांनी परकीयांचा आधार घेतला तो केवळ त्यांच्या तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून, पण ते करताना सदर परकीय हात-पाय पसरणार नाहीत याची काळजी त्यांनी घेतली आणि त्यांचा वापर स्वराज्यनिर्मितीसाठी करून घेतला, असे कामत म्हणाले.
स्वदेश, स्वाभिमान, स्वराज्य, स्वसंस्कृती यांचे संरक्षण व संवर्धन करण्याबरोबरच परराष्ट्रीय भाषा, संस्कृती, धर्म, स्त्रिया यांचा आदर केला पाहिजे हे शिवाजी महाराजांनी परकीयांना दाखवून दिले, असे कामत यांनी सांगितले. शिवरायांनी शहिस्तेखानाला धडा शिकवला तेव्हा पोर्तुगीजांनी पत्र पाठवून शिवरायांचे अभिनंदन केले. मोघलांसारख्या बलाढय़ शक्तीचा मुकाबला करणाऱया शिवाजी महाराजांच्या शक्तीची पोर्तुगीजांना प्रचिती आली होती, असे शाखा विस्तार समिती प्रमुख राजू विर्डीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी सूर्यकांत प्रियोळकर, सासष्टी तालुका प्रमुख, अशोक प्रभू, सुशांत पावस्कर, उत्तर जिल्हा प्रमुख यांची भाषणे झाली. या कार्यक्रमात उपस्थित मुलांसह सर्वांना भेटवस्तू देण्यात आल्या. सूत्रसंचालन प्रदीप कारेकर यांनी केले.