प्रतिनिधी / कोल्हापूर
`लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं’, असे पोवाडे गाणारा मराठा समाज आहे. आरक्षणा संदर्भात आज जरी परिस्थिती विरोधात वाटत असली तरी या अंधारातून उद्या नक्कीच पहाट होईल. त्यामुळे माझ्या शूर सरदारांनो खचून जावू नका, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील युवक-युवतींना धीर दिला. तसेच आरक्षणाची लढाई आपण नक्कीच जिंकू आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही त्यांनी ट्विटरद्वारे केले.
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा संघटनांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. याच मुद्यावरुन बीड येथील विवेक राहाडे या महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केली. या घटनेबाबत खासदार संभाजीराजे यांनी दुखः व्यक्त केले. विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासबोत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणे, ही कधीही न भरुन निघणारी हानी आहे.
मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे. त्याचबरोबर माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होवून आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का ? असा प्रश्न करत आरक्षणासाठीच्या लढाईत प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. आरक्षणप्रश्नी केंद्र आणि राज्य सराकार स्तरावर आवज उठविण्याचे काम सुरु आहे. मराठा आरक्षणाला कोणत्याही समाजाचा विरोध नाही. आरक्षण सर्वबांजूनी सकारात्मक आहे. थोडा वेळ लागेल पण आरक्षण आपन नक्की मिळवू, त्यामुळे कोणीही आत्महत्येचा पर्याय निवडू नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले आहे.