शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रारंभ : शिक्षण खात्याचा निर्णय
प्रतिनिधी बेळगाव
गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते 2022-23 या शैक्षणिक वर्षात भरून काढण्यासाठी सेतूबंध उपक्रम राबविण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे.
2019 पासून शैक्षणिक हेळसांड सुरू आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू होऊ न शकल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण खात्याने शैक्षणिक सुटीत 15 दिवसांची कपात केली आहे. यापूर्वी 28 मे पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत होती. दोन वर्षांत शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे. यंदा मात्र 16 मे पासूनच शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.
कोरोनामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी खात्याने सुटीत कपात केली असून या काळात पुनःप्रिती शिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. मागील इयत्तांमधील अभ्यासक्रमाची या दरम्यान विद्यार्थ्यांकडून उजळणी करवून घेतली जाणार आहे. कमीत कमी काळात ही उजळणी पूर्ण करून घेण्यासंदर्भातील प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भात जिल्हय़ातील 28 शिक्षकांकडून विविध विषयांबाबत अभ्यासक्रम पुस्तिका तयार करून घेण्यात आल्या होत्या. त्यांचे अवलोकन या काळात होणार आहे. हा उपक्रम कसा व किती काळ चालवावा, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
हा स्तुत्य उपक्रम
कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सलगतेत खंड पडला होता. त्याचा परिणाम म्हणून शैक्षणिक नुकसान साहजिक होते. ते भरून काढण्यासाठीचा हा स्तुत्य उपक्रम आहे.
– गोविंद पाटील, सीआरसी