श्रावण महिना सुरू होताच भाज्यांचे दर कडाडले : महागाईने गाठला कळस
अजय कांडर / कणकवली:
कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारले गेले आणि महागाईने कळस गाठला. यात सर्वाधिक भरडल्या गेल्या त्या महिलाच. श्रावणात भाज्यांचा दर भडकल्याने ऐन सणांच्या दिवसांत महागाईचे चटके सोसत ‘श्रावणात बाई भाज्यांचे दर परवडेनात’ असे शब्द गृहिणींच्या तोंडात आपसूक येत आहेत.
आठ दिवसांपूर्वी भाज्यांचा दर होता तो, श्रावण सुरू होताच, अवघ्या चार दिवसांत जवळजवळ दुप्पट झाला आहे. कोरोना विषाणूच्या या काळात लागू केल्या गेलेल्या टाळेबंदीच्या प्रारंभापासून भाज्यांना जास्त मागणी आहे. त्यातही आता श्रावण महिन्यात त्या मागणीत आणखी वाढ झाली आहे. या सगळय़ाचा फायदा किरकोळ भाजी विपेते घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मागच्या आठवडय़ापेक्षा काही भाज्यांचा दर 30 ते 50 टक्क्यांनी वाढला आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, वाहतूक खर्च वाढल्यामुळे किरकोळ विक्रीत दर वाढवावा लागला, असे काही विपेत्यांकडून सांगण्यात येत असले, तरी अचानक चार दिवसांत वाहतूक खर्च कसा वाढला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात प्रारंभी भाज्यांची आवक घटल्याने दर वाढले, असे सांगण्यात येत होते. मात्र, आता वाहतूक सुरळीत झाली, तरी भाज्यांचे दर मात्र वाढलेले आहेत. श्रावणात भाज्यांचे दर वाढतातच, असं विक्रेत्यांकडून थातूरमातूर सांगण्यात येत आहे. टाळेबंदीतही शहरात होणारी भाज्यांची आवक स्थिर आहे. तरीही गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. श्रावण महिन्यात अनेकांनी शाकाहार अवलंबिल्यामुळे भाजी बाजारात ग्राहकांची वाढती गर्दी दिसत आहे.
भाजी जीवनावश्यक आहे. समाजातील काही वर्ग पूर्ण शाहाकारी असतो. त्यामुळे वर्षाचे 365 दिवस त्यांना भाजी लागतेच. जर असे भाज्यांचे दर वाढत राहिले, तर घरखर्च अधिक कोलमडणार असून त्यामुळे मन:स्ताप सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया आराध्या अभिजीत सावंत (रा. त्रिंबक) या गृहिणीने व्यक्त केली.
स्थानिक भाजी विक्रेत्यांना अडचणी
लॉकडाऊनच्या काळात भाजी उत्पादन घेणाऱया स्थानिक शेतकऱयांना ती विकण्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊन शिथील झाले, तरी गावोगावी सार्वजनिक वाहतूक सुविधा अजून सुरळीत झालेली नाही. त्यामुळे तालुक्मयाच्या ठिकाणी भाजी घेऊन विक्री करणे कठीण जात असल्याचे स्थानिक भाजी उत्पादन घेणाऱया शेतकऱयांनी सांगितले.
दर प्रत्येकी किलोचा
भाजी मागील आता
वांगी 50 80
साधी मिरची 60 80
सिमला मिरची 60 80
फरसबी 80 100
फ्लॉवर, कोबी 50 60
टोमॅटो 40 50
कारलं 60 80
गवार 60 80
घेवडा 60 80