आपल्या दक्षिणेला असलेला छोटासा श्रीलंका सध्या अक्षरक्षः पेटला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीने आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडय़ाने लोक पेटून उठलेत. तेथील राष्ट्रपतींच्या निवासस्थानालाच त्यांनी घेराव केला आणि त्याचा परिणाम तिथे आणीबाणी घोषित करण्यात झाला आहे. गोटाबाय राजपक्षे या राष्ट्रपतींनी आपला धाकटा भाऊ असलेल्या तेथील अर्थमंत्र्यांची हकालपट्टी केली. विरोधी पक्षांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी समाज माध्यमे जवळजवळ बंद करण्यात आली आहेत. पण वणवा शांत होण्याची चिन्हे नाहीत.
श्रीलंकेचे सारे पापग्रह एकत्र आले आहेत अशी स्थिती आहे. पेट्रोल-डिझेलचा एव्हढा तुटवडा आहे कि भारताने 40,000 टन इंधन त्वरेने पोहोचवून देखील ‘उंट के मुह में जीरा’ अशी स्थिती आहे. तेथील रुग्णालयात औषधांचा भयंकर तुटवडा असल्याने डॉक्टरमंडळी देखील निदर्शनात सामील झालेली आहेत. अतिशय गंभीर रुग्ण विभागात देखील प्राण वाचवण्यासाठी नितांत असलेली औषधे संपत आली आहेत. तर विद्यार्थी या निषेधात आघाडीवर आहेत. वकील मंडळी देखील एकजुटीने विरोधकांच्या मोहिमेत सामील झालेली आहेत. एवढय़ा चिमुकल्या देशात गेल्या पाच दिवसात 100 ठिकाणी निदर्शने झाली आहेत. स्वतःच अडचणीत असलेल्या नवी दिल्लीने जमेल तसे आर्थिक सहाय्य करून देखील कोलम्बोला अजून सारे काही हवेच आहे. आभाळच कोसळले आहे त्याला ठिगळ किती लावणार? अल्पसंख्यांक मुस्लिम आणि तामिळ समाजाच्या विरोधात राजकारण करून आणि बहुसंख्यांक बौद्ध समाजाला चेतवून 2019 साली सत्तेत आलेले सरकार एवढे अडचणीत आले आहे कि ‘विरोधी पक्षांना बरोबर घेऊन राष्ट्रीय सरकार स्थापण्याची त्यांची सूचना धुडकावून लावण्यात आलेली आहे. राष्ट्रपतींच्या हकालपट्टीची मागणी साऱया श्रीलंकेत होत आहे आणि ते लवकरच लष्करी शासन लावतील अशी भीती विरोधकांना वाटत आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटनावर पोट भरणाऱया या छोटय़ा बेटाचा हा मुख्य व्यवसाय डुबू लागला आहे कारण अमेरिकेसह बऱयाच प्रगत देशांनी ‘श्रीलंकेपासून दूर राहा’ असा जाहीर सल्ला आपल्या नागरिकांना दिलेला आहे. श्रीलंकेतील तामिळ लोकांचे लोंढे हळूहळू तामिळनाडूकडे येऊ लागले आहेत. भारताचा दुसरा शेजारी पाकिस्तान देखील राजकीय अस्थिरतेकडे चालला आहे. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत हवेत उडणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांचा त्यांच्या पक्षासह धुव्वा उडाला. तद्वतच त्यांचे क्रिकेटर मित्र आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे इस्लामाबादमध्ये होताना दिसत आहे. गेल्या आठवडय़ात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांना जीवघेणा दणका दिला आहे. पाकिस्तानच्या उपसभापतीला फितवून नॅशनल असेम्ब्ली भंग करण्याचा इम्रानचा डाव त्यांच्या अंगलट आला आहे.
सौदी अरेबिया सारख्या मित्रदेशांनी पाकिस्तानला आर्थिक मदत देणे बंद केले आहे आणि इतर मुस्लिम देशात देखील त्याची पत खालावलेली आहे. बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती.
भारतातील चित्रः चढा ‘जीडीपी’
आर्थिक स्थितीबाबत भारताचे चित्र देखील चिंताजनक आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर जवळजवळ दररोज वाढवण्यात आले आहेत ते स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच झाले. गेल्या पंधरा-वीस दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दर लिटर मागे दहा रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. सीएनजी आणि कुकिंग गॅसचे भावही भरपूर वाढवून सामान्य माणसाला सळो कि पळो केले आहे. ‘हलाल’ पद्धत वापरून ग्राहकांना ‘झटका’ दिला जात आहे, अशी टीका समाज माध्यमांवर होत आहे. तेल मंत्री हरदीप पुरी यांनी ही तेल दरवाढ जागतिक दरवाढीच्या तुलनेने काहीच नाही असे सांगून सामान्य माणसाच्या जखमेवर जणू मीठच चोळले आहे. जगात सर्वात जास्त भाववाढ झालेले देश आहेत त्यात भारताचे स्थान अतिशय वरचे आहे असे जाणकार सांगतात.
गेल्या आठवडय़ात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक दिवस अगोदर गुंडाळण्यात आले. विरोधी पक्षांना भाववाढीची आणि विशेषतः पेट्रोल आणि पेट्रोलजन्य पदार्थांच्या भडकलेल्या भावांविषयी चर्चा करायची होती पण ती होऊ दिली गेली नाही. या भाववाढीबाबत सरकारमधील कोणीही जबाबदार नेता अजिबात बोललेला नाही. राज्यसभेतून निवृत्त होत असलेले भाजपचे जे÷ नेते सुब्रमणियन स्वामी यांनी पेट्रोलजन्य पदार्थांच्या या दरवाढीने साऱया देशात एक प्रक्षोभक स्थिती निर्माण होत आहे. अर्थ मंत्रालयाच्या ‘बौध्दीक दिवाळखोरी’ मुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. हे राष्ट्र विघातक आहे, अशी कडवट टीका स्वामी यांनी केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे नाव न घेता ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असेच त्यांचे काम आहे असे स्वामी यांना सुचवावयाचे आहे. स्वामी यांना पंतप्रधानांकडून राज्यसभेची अजून एक टर्म पाहिजे असल्याने ते त्यांच्यावर डायरेक्ट टीका करत नाहीत इतकेच.
युपेनमधील युद्धाने देशाच्या प्रश्नात अजूनच वाढ केलेली आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी आहे असे सांगितले जात असले तरी त्यामुळे वास्तव चित्र मात्र दिसत नाही. वाढत्या महागाई आणि बेकारीने देशाला ग्रासले आहे. गेल्या आठवडय़ात तिरंगा हातात धरून राजस्थानच्या सीकर पासून 350 किलोमीटर धावत राजधानीत आलेल्या तरुणाची एकमेव मागणी होती कि सरकारने सैन्यभरती ताबडतोब सुरु केली पाहिजे. देशातील, विशेषतः उत्तरेतील लाखो तरुण अशा भरतीची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. पण त्यांचे स्वप्न कधी साकारणार ते कळत नाही कारण याबाबत कोणी काहीच बोलत नाही.
सुनील गाताडे