प्रतिनिधी / संकेश्वर
संकेश्वर शहराच्या विकासात जुन्या महामार्गाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. नार्वेकर मळय़ापासून ते मध्यवर्ती टपाल कार्यालयापर्यंत जुना महामार्गाचे रुंदीकरणा न करताच पुनर्बांधणी करण्यात आली. मात्र भविष्यातील 50 वर्षांची परिस्थिती पहाता या मार्गाचे 60 अधिक 60 असे 120 फुटाचे रुंदीकरण होणे क्रमप्राप्त आहे. टपाल कार्यालयापासून ते युपी धाब्यापर्यंत रुंदीकरण झाले. मग या मार्गाचे रुंदीकरण करण्यात कोणता अडसर आला, निधी नाही कि इच्छीशक्तीचा अभाव आहे? असा सव्वाल शहरवासीयातून उपस्थित झाला आहे.
नार्वेकर मळय़ापासून ते मध्यवर्ती टपाल कार्यालयापर्यंत 2.70 कि. मी. अंतराचा हा मार्ग आहे. सध्या या मार्गाच्या दुतर्फा लोकवस्तीसह व्यापारी संकूले उभी रहात आहेत. जमीन मालकांनी शेती पिकविणे बंद करुन प्लॉटींग करुन प्लॉटची विक्री सुरु केली आहे. त्यामुळे आगामी 5 वर्षात नार्वेकर मळा ते युपी धाबा अशा 4.5 कि. मी. अंतरावरील दुहेरी बाजू व्यापारी संकुलानी भरलेली असणार. तथापी एक मोठी बाजारपेठ अस्तित्वात येणार आहे. शिवाय या विस्तारीत भागात नव्या लोकवस्त्याही बसणार आहेत. त्यामुळे आगामी काळ हा सर्वच वर्दळीचे प्रमुख केंद्र बनणार आहे. तत्पूर्वी नार्वेकर मळा ते टपाल कार्यालयापर्यंतचा महामार्ग 120 फूट प्रमाणे रुंदीकरण झाल्यास भविष्यात वर्दळीच्या दृष्टीने कोणत्याच अडचणी येणार नाहीत.
सध्या जेवर्गी-संकेश्वर, पणजी-हैद्राबाद या राज्यमार्गासह नव्याने बांदा-संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या सर्वच बाजू राष्ट्रीय व राज्य महामार्गानी व्यापल्या आहेत. मोठय़ा बाजारपेठेच्या व दळण-वळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी हे शहरवसले असताना दूरदृष्टीने या शहराच्या भोवती असणाऱया महामार्गांचा विकास झाला पाहिजे. जेणेकरुण रिकाम्या हातांना काम मिळावे व ग्रामीण भागातील उत्पादीत शेतीमालाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी सुलभ वाहतूक झाली पाहिजे. याशिवाय पर्यटकांच्या दृष्टीने खास अशी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे.
जुने शहर फक्त लोकवस्तीचे ठिकाण
शहराची प्रमुख बाजारपेठ असणाऱया सुभाष रोड, आझाद रोड, गांधी चौक व नेहरु रोड या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती. पण अलिकडील 15 वर्षात याठिकाणची जुनी बाजारपेठ बाहेरच्या ग्राहकांअभावी ऱहासाच्या मार्गाला लागली आहे. शहरातील बडे, बडे व्यापारीही जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा व्यापारी संकूले मिळविण्याच्या शोधात आहेत. तथापी बरीच मोठी बाजारपेठही उदयास येऊ लागली आहे. आगामी काळात बाजारपेठेचे स्वरुप मोठय़ा प्रमाणात व्यापक व विस्तारीत दिसणार आहे. त्याचेच पहिले पाऊल म्हणजे सुभाष रोडवरील भाजीपाला बाजार मार्केट यार्डात स्थलांतर करण्यात आला आहे. शहरवासीयांसह बाहेरुन येणाऱयांनाही खरेदी विक्रीच्या दृष्टीने अनुकूल व्हावे. शिवाय सोने, चांदी, कपडे, धान्य, भाजीपाला, मच्छी, मटण, हार्डवेअर, गॅरेज, स्टेशनरी, वाईनशॉप अशांची स्वतंत्र बाजारपेठ उभी करावयाची आहे. याबाबतचे नियोजनही आमदार उमेश कत्ती यांच्या दृष्टीक्षेपात आहे. त्यामुळे सर्व सोयी-सुविधांसाठी जनतेकडून सहकार्य हवे. यासाठी आगामी काळात शहराच्या पातळीवर नियोजन बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.