निर्बंधात आणखीही शिथिलता येण्याची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
राज्यव्यापी संचारबंदीत आणखी एका आठवडय़ाने वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीस रवाना होण्यापूर्वी रविवारी ही घोषणा केली आहे. कोरोना नियंत्रणात असल्यामुळे संचारबंदीत आणखी काही शिथिलता देता यईल का याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा आदेश लवकरच काढण्यात येणार येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विद्यमान संचारबंदीची मुदत आज सोमवारी सकाळी 7 वाजता संपणार होती. आता त्यात आठवडाभराची वाढ करण्यात आल्यामुळे दि. 26 जुलै रोजी सकाळी संपणार आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी संचारबंदीत वाढ करताना सायंकाळी 6 पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. तसेच हॉटेल्स, मद्यालये, केशकर्तनालये, जीवनावश्यक दुकाने, क्रीडा संकुले (बाह्य विभाग) यांना अंशतः किंवा किमान 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्यास अनुमती देण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर दि. 11 पासून वाढविण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत 50 टक्के उपस्थितीत व्यायामशाळा, प्रेक्षकांशिवाय क्रीडा प्रकल्प आणि जास्तीत जास्त 15 माणसांच्या उपस्थितीत धार्मिक स्थळे खुली करण्यास सूट देण्यात आली होती. त्याचबरोबर दुकांनाच्या वेळेमध्येही आणखी एका तासाने वाढ देताना सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला होता. आता उद्यापासून सुरू होणाऱया आठवडय़ासाठीही तीच सूट कायम ठेवण्यात आली आहे. मास्क वापरणे व सामाजिक अंतराचे पालन करणे सक्तीचेच असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संचारबंदी वाढ कोणासाठी? : लोकांच्या मनात संभ्रम
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत वारंवार संचारबंदी वाढवत असले तरी ती आहे कुठे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली असतात मग संचारबंदी असण्याचा आणि ती वाढवण्याचा प्रश्न येतोच कुठे? अशी विचारणा जनतेमधून सुरू आहे. सध्या तरी गोव्यात संचारबंदी नाही असेच एकंदरीत चित्र आहे.
यापुर्वी संचारबंदी नसताना बहुतेक सर्व दुकाने रात्री 8 पर्यंत बंद व्हायची. त्यानंतर शहरातील वर्दळ ठप्प होत असत व त्यानंतर शुकशुकाट दिसून यायचा. आतासुद्धा सर्वसाधारण तशीच परीस्थिती असून सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकानांसाठी अनुमती असली तरी ती बंद होईपर्यंत 8 वाजून जातात. परिणामी दिवसभरात तरी संचारबंदी दिसत नाही. सर्व काही सुरळीत चालू असते. रात्री 8 नंतर शुकशुकाट म्हणजे संचारबंदी दिसून येते तथापि तो शुकशुकाट संचारबंदी लावण्यापूर्वीसुद्धा दिसून यायचा. त्यामुळे आता संचारबंदी आहे कुणासाठी? वाढवतात कुणासाठी? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मद्याची दुकाने, बार, रेस्टॉरंट, हॉटेल्ससुद्धा रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतात फक्त कॅसिनो बंद आहेत. एवढेच काय ते ? त्यामुळे संचारबंदी वाढ कोणासाठी? अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.