ऑनलाईन टीम / मुंबई :
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर येत आहे. हा मुद्दा विरोधी पक्ष विधानसभेत उचलून धरण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितनुसार, तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून ही राज्यपालांना मिळालेला नाही, म्हणजेच अजूनही राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या संजय राठोड अद्यापही वनमंत्री पदावर कायम आहेत.
रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी आता पुढे काय अशी विचारणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतला नाही. त्यांचे म्हणणे असे होते की राजीनामा लवकरच राज्यपालांकडे पाठवला जाणार आहे. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पोहोचलेला नाही. म्हणजेच, कायदेशीरदृष्ट्या संजय राठोड वनमंत्री पदावर कायम आहेत.
राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपले मंत्रिपद टिकावे म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.