अन्यथा जिल्हाभर पडसाद उमटतील : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाचा इशारा
प्रतिनिधी / कणकवली:
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी तेली समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. पक्षीय पातळीवर एकमेकांवर टीका करण्याबाबत आमचे दुमत नाही. मात्र, ही टीका करताना कोणत्याही समाजाची भावना दुखावली जाणार नाही, याचे तारतम्य बळगायला हवे. परब ज्या पक्षाचे आहेत, त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीही तेली समाजाचेच आहेत. त्यामुळे परब यांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा जिल्हाभर याचे पडसाद उमटतील व निवडणुकांमध्ये तेली समाज त्याच पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाने दिला.
संघटनेतर्फे येथील कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तेली, सचिव चंद्रकांत तेली, खजिनदार परशुराम झगडे, सल्लागार आबा तेली, सदस्य शैलेंद्र डिचोलकर, साई आंबेरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश काळसेकर, सचिव दत्ताराम हिंदळेकर, उपाध्यक्ष विशाल नेरकर आदी उपस्थित होते.
संजू परब यांनी ‘कहाँ राजा भोज व कहाँ गंगू तेली’ असा उल्लेख करताना गद्दार या शब्दाचाही उल्लेख केलेला आहे. मुळात अशी वक्तव्ये करताना समाजाच्या भावना दुखावणार नाहीत, याचा विचार त्यांनी करायला हवा होता. मुळात गंगू तेली हा शब्द व त्यापाठी मागील इतिहास त्यांनी समजून घ्यायला हवा. पुरातन म्हणींचा वाटलं म्हणून कुठेही उल्लेख कसा केला जातो. मुळात गंगू तेली ही व्यक्ती नाही, तो शब्द अपभ्रंश आहे. गांगेय नरेश म्हणजे राजा व चालुक्य तैलय या राजांनी भोज राजाशी युद्ध केले. ते गद्दार हेते का? याचा पुरावा परब यांच्याकडे असेल, तर त्यांनी तो दाखवावा. अशी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे लक्ष्मण तेली व चंद्रकांत तेली म्हणाले.
आज प्रत्यक्ष पक्षात तेली समाजाचे कार्यकर्ते आहेत. पक्षीय काम सामाजिक भेद भावनेतून केले जात नाही. त्यामुळे परब यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल. त्यांनी अगोदर इतिहास समजून घ्यावा. मते मागताना सर्व समाजाकडे जाऊन हात जोडले जातात. मात्र, निवडणुकीनंतर जात काढली जाते. त्यामळे तेली समाजाच्या बदनामीचा असा प्रयत्न होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. परब यांनी वक्तव्य मागे न घेतल्यास त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असेही समाजातर्फे सांगण्यात आले.