अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 19 फेब्रुवारी 2022, दुपारी 12.00
●शिवभक्तांकडून शिवजयंती उत्साहात साजरी
●नव्याने बाधित वाढ ही पन्नाशीच्या आतच
●सर्वच तालुके दहाच्या आतमध्ये
प्रतिनिधी / सातारा :
कोरोनाच्या निर्बंधामुळे सर्वच व्यवसायिकांसह सर्वसामान्यांना मोठय़ा गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्यामध्ये संपूर्ण अनलॉक करण्याचा निर्णय शासन केव्हा घेणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. दरम्यान, शिवजयंती उत्साहात जिल्ह्यात साजरी होत आहे. जिल्ह्यात नव्याने होणारी बाधित वाढ ही पन्नाशीच्या आतमध्येच असून बाधितवाढ आता स्थिर ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रशासनाकडून कोरोना मुक्तीचा निर्धार यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सर्वच तालुके दहाच्या आतमध्ये
जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये फेब्रुवारीच्या 17 दिवसांमध्ये नव्याने होणारी बाधित वाढ मंदावली असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सर्वच तालुक्यांमध्ये नव्याने होणारी बाधित वाढ ही शुन्यावर आणण्यासाठी त्या त्या तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काम करत आहे. सर्वात नेहमी पुढे असणाऱ्या सातारा तालुक्यामध्येही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी सेवानिवृत्तीची मुदत संपलेली असतानाह प्रशासनाच्या आग्रहाखातर चांगले काम करत तालुक्याची परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. त्याच बरोबर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष यांनी कोरोना काळात चांगले काम केले. अजूनही त्यांच्याच नेटक्या नियोजनामुळे आणि योग्य कार्यतत्परतेमुळे कोरोना बाधित वाढीचा आलेख खाली उतरत आहे. सर्वात कमी बधित आढळून येणारा तालुका म्हणजे महाबळेश्वर. त्यापाठोपाठ जावली व इतर तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी जाहिर झालेल्या अहवालात 26 जण नव्याने बाधित आढळून आले तर 1749 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.49 वर आलेल्या आहे.
शिवजयंती उत्साहात साजरी
शिवजयंतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध लावले होते. शासनाचे सर्व नियम पाळून शिवभक्तांनी जल्लोषात शिवजयंती साजरी केली. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये भगवे वातावरण झाले होते. सातारा शहरात शिवतीर्थावर शिवभक्तांनी शिवप्रभूंच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या. हिरकण फेडरेशनच्या भगिनींनी वैराटगडावरुन दौडत शिवज्योत आणली होती. मोठा उत्साह सकाळपासून शिवभक्तांमध्ये दिसून येत होता.
जिल्ह्याच्या नजरा संपूर्ण अनलॉककडे
कोरोनाचे हे गेलेले दोन वर्ष प्रत्येकाला स्मरणात राहतील असेच आहेत. परंतु अजूनही पूर्णतः अनलॉक झालेले नाही. हे पूर्णपणे अनलॉक कधी होणार?, राज्य सरकार यावर कधी निर्णय घेणार?, राज्याचा व देशाचा टास्क फोर्स नेमका कधी आदेश देणार आणि सर्वसामान्यांना मोकळेपणाने पुन्हा कधी वावरायला मिळणार अशी भावना सर्वच नागरिकांची असून सगळय़ांच्या नजरा सरकारच्या पूर्ण अनलॉककडे आहेत. फक्त सरकार कधी निर्णय घेते त्यावर सारे अवलंबून आहे.
शनिवारी
नमुने-1749
बाधित-26
सोमवारपर्यंत
नमुने-25,41,877
बाधित- 2,78,864
मुक्त-2,70,951
मृत्यू-6668