उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश : पर्यावरण संरक्षणाचाही विचार करावा
प्रतिनिधी / बेंगळूर
पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्यहित विचारात घेऊन राज्यात सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी करता येईल का? याबाबत तीन महिन्यांत योग्य निर्णय घ्या, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण फटाके बंदीसाठी बेंगळूरमधील चार्टर्ड अकौंटंट डॉ. ए. एस. भरत विष्णू आणि समर्पण स्वयंसेवा संस्थेने उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे जनहित याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकांवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न आणि न्या. एम. जी. उमा यांच्या खंडपीठाने फटाके विक्री आणि वापरावर न्यायालय बंदी घालू शकत नाही. पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचा विचार करून सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालता येईल का?, यासंबंधीचा निर्णय 3 महिन्यांत घ्या, असा आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.