परिसरातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मच्छे, संभाजीनगर येथील रहिवासी असलेल्या भागातच अनेक उद्योग, व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एक तर संभाजीनगर परिसराला कोणत्याच मूलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा तातडीने येथील उद्योग बंद करावेत आणि आम्हाला मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी येथील रहिवाशांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रहिवाशी असणाऱया ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करणे हे बेकायदेशीर आहे. याबाबत अनेकवेळा वरिष्ठाना तसेच ग्राम पंचायतीला कळविण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तक्रार केल्यानंतर अनेक उद्योजक दादागिरी करत आहेत. त्यामुळे येथील जनता तणावाखाली आहे. रात्रंदिवस हे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे मुलांना अभ्यास करणे अवघड बनले आहे. तेंव्हा औद्योगिक क्षेत्रामध्येच येथील उद्योजकांना जागा द्यावी आणि त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यास भाग पाडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे संभाजीनगर परिसरात रस्ते, गटारी, वीज, पाणी नाही याबाबत अनेकवेळा ग्राम पंचायतीकडे निवेदने देण्यात आली. आता नगरपंचायतचा दर्जा दिला गेला आहे. तेव्हा तातडीने येथील फौंड्री तसेच इतर कारखाने हटवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सुरेश रेडेकर, राकेश बैलुरकर, लोकेश चंडी, संतोष सुतार, प्रवीण भातकांडे, दीपक पाटील, सुनील मुचंडीकर, ईश्वर मुचंडीकर, सत्याप्पा खाकी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.