लडाख सीमेजवळ कारवाई : भारतीय सैन्याकडून कसून चौकशी सुरू : हेरगिरीचा संशय
लडाख / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारत-चीन तणावाच्या दरम्यान सोमवारी एका चिनी सैनिकाला भारतीय सैनिकांनी ताब्यात घेतले. भारत-चीन सीमेवर तणाव कायम असतानाच चुमार-डेमचोक भागात ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने अनावधानाने भारतीय हद्दीत शिरल्याचा प्राथमिक अंदाज असून दोन्ही देशांतील प्रोटोकॉलनंतर पूर्ण चौकशीअंतीच त्याला चीनकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. सदर सैनिकाला वैद्यकीय उपचार, अन्न आणि उबदार कपडेही पुरविण्यात आल्याचे लष्कराने स्पष्ट पेले आहे.
लडाखमधील चुमार-डेमचोक भागात गस्तीवर असलेल्या सुरक्षा यंत्रणांना एक चिनी सैनिक दिसल्यानंतर त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. हा सैनिक चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या एका तुकडीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडे नागरी आणि लष्करी कागदपत्रे सापडली आहेत. कागदपत्रांनुसार तो झीजियांग प्रांतातील रहिवासी असून वँग या लाँग असे त्याचे नाव आहे. सैन्यामध्ये शस्त्रास्त्रे दुरुस्त करण्याचे काम तो करत होता. मात्र, पीएलएचा हा सैनिक हेरगिरीच्या मोहिमेवर होता का? त्याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. प्रस्थापित शिष्टाचार आणि प्रक्रियेनुसार या सैनिकाला पुन्हा चीनला सोपवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
उंचावरील प्रतिकुल वातावरणामुळे या सैनिकाला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय सहाय्य करण्यात आले. त्याला ऑक्सिजन, अन्न आणि उबदार कपडे देण्यात आल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. बेपत्ता असलेल्या सैनिकाबाबत पीएलएकडूनही विनंती करण्यात आली होती. प्रस्थापित द्विपक्षीय शिष्टाचारानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चुशूल-मोल्डो येथे या सैनिकाला पुन्हा चीनकडे सोपवले जाईल, असे सैन्याकडून सांगण्यात आले. एप्रिल ते मे महिन्यापासून भारत आणि चीनची सैन्ये समोरासमोर आहेत. सीमेच्या दोन्ही बाजूला मोठय़ा संख्येने जवान तैनात आहेत. अशावेळी चिनी सैनिकाने नकळत सीमा ओलांडणे ही मोठी घटना मानली जात आहे.
भारत-चीन चर्चेच्या फेऱया सुरूच
लडाखमधल्या चीन सीमेवरचा तणाव अजूनही कायम आहे. भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱयांमध्ये चर्चेच्या फेऱया सुरू आहेत मात्र त्यातून काहीही तोडगा निघत नाही. भारत आणि चीनमध्ये आतापर्यंत सात फेऱयांची चर्चा झाली आहे. पण त्यातून ठोस काही निष्पन्न झालेले नाही. चीनने घुसखोरी केलेल्या भागांमधून प्रथम माघार घ्यावी, ही भारताची भूमिका कायम आहे. लवकरच दोन्ही देशांच्या सैन्य आणि परराष्ट्र प्रतिनिधींमध्ये आठव्या फेरीची चर्चा पार पडणार आहे.
चीनच्या आडमुठेपणाला भारताची चोख भूमिका
चीनची आडमुठी भूमिका कायम असून भारताच्या कुरापती काढण्याचे काम सतत सुरू आहे. चीनच्या विश्वासघातकीपणाचा अनुभव असल्याने भारतीय लष्कराने आता सर्व तयारी सुरू केली आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर लष्कर आणि हवाई दल एकाचवेळी आघाडी सांभाळणार असून कशाप्रकारे चीनचा सामना करायचा याचा आराखडा तयार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.