वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संसदेवरील हल्ल्याला सोमवारी 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या शूर सुरक्षा कर्मचाऱयांना श्रद्धांजली वाहिली आहे. 2001 च्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या संसदेचे रक्षण करताना स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱया शूर जवानांना श्ा्रद्धांजली वाहतो. त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी देश सदैव त्यांचा ऋणी राहणार असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
भारतीय लोकशाहीचे मंदिर संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राष्ट्राच्या गौरवाच्या रक्षणाकरता स्वतःचे सर्वोच्च बलिदान देणाऱया सर्व जवानांच्या साहस आणि शौर्याला नमन करतो. त्यांचा अद्वितीय पराक्रम आणि अमर बलिदान सदैव आम्हाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करत राहणार असल्याचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले आहेत. 2001 मध्ये संसद भवनावर झालेल्या हल्ल्यादरम्यान स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱया जवानांना श्रद्धांजली. देश त्यांचे साहस आणि कर्तव्याबद्दल केलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी सदैव आभारी राहणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.