कोरोना नावाचा महाराक्षस सारे जग गिळंकृत करण्यास सज्ज झालेलाच आहे. या कल्पनेने भगवद् गीतेतील विश्वरूपदर्शनयोग आठवला. अर्जुन युद्धाच्या कल्पनेने संभ्रमित झालेला असताना श्रीकृष्णाने त्याला विश्वरूपदर्शन घडवले. त्या रूपाने अर्जुन अधिकच भांबावला. कारण त्याला श्रीकृष्णाचाच आदी आणि अंत कुठे झाला आहे हेच दिसत नव्हते. फक्त त्याने ‘आ’ वासलेल्या मुखातील कराल दाढांमधून अर्जुनाला आपले सर्व नातेवाईक त्या मुखात जाऊन त्यांचे चूर्ण होताना दिसत होते. जे सारे आत्ता जिवंत होते! ते दृश्य सहन न होऊन अर्जुनाने भगवंताला आपले ते विराट रूप आवरते घ्यायला सांगितले. भगवंतांनी मूळ रूपात येऊन अर्जुनाला सांगितले की, एक दिवस सर्वांनाच या काळाच्या कराल दाढांमध्ये जावे लागणार आहे. जे तुझे शत्रू आहेत, तेही तुझे नातेवाईकच आहेत. पण तुझ्या जिवाभावाचे जे सख्खे आहेत, तेही एकदा तिकडेच जाणार आहेत, पुन्हा न येण्यासाठीच. पण जाता जाता एखादे सत्कर्म करून गेले तर आयुष्याचे सार्थक होते. तुला ते करायचे आहे. इथे तुला अधर्माने वागणाऱयांवर विजय मिळवायचा आहे आणि धर्माची प्रति÷ापना करायची आहे. त्यासाठी युद्ध अटळ आहे. म्हणूनच तुला निश्चय, धैर्य, मन, बुद्धी एकवटून सज्ज झाले पाहिजे….अर्जुनाचे मनपरिवर्तन केल्यावर युद्ध झाले. दोन्ही पक्षांचे अनेक योद्धे, नातेवाईक धारातीर्थी पडले. पण अखेर सत्याचा विजय झाला. खरे तर पांडव पाचच होते, तर कौरव शंभर होते. त्यांचे सैन्य अफाट होते. पण मूठभर लोक जरी एकत्र आले आणि एकजुटीने एखादे मोठे कार्य उभारले, तरी ते पार पडते, यशस्वी होते. त्यासाठी सद्हेतू, जिद्द, निश्चय महत्त्वाचा असतो. गवताची एक काडी कोणीही तोडू शकतो. पण त्याच गवताच्या दोरीने एखाद्या हत्तीलाही बांधता येते. हा श्लोक पहा ना…
अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका। तृणैर्गुणत्वमापन्नै: बध्यन्ते मत्तदन्तनि:।। अर्थः क्षुल्लक, दुर्बल वस्तूंची एकजूटसुद्धा मोठे कार्य घडवून आणणारी ठरते. उदा. गवताच्या वळलेल्या दोरखंडाने मदोन्मत्त हत्तींना सुद्धा बांधता येते. संघटना शक्तीचे बळ दाखवणारे हे उदाहरण. सर्वांवर आलेल्या संकटांचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट केली तर अल्पशक्तीच्या लोकांकडूनही मोठे कार्य घडू शकेल. कोरोनाला हरवण्यासाठी साऱया जगाला या लसींचा उपयोग होणार आहे. आतापर्यंत त्याच्या कराल दाढांमध्ये आपल्या जिवाभावाची, आजुबाजूची अनेक लहानथोर माणसे नष्ट झाली आहेत. जी आहेत, ती तरी सुखरूप राहण्यासाठी, जग निरामय होण्याच्या सत्कार्यात आपणही योगदान दिले पाहिजे. मग या युद्धात आपल्याला नेमके काय करायचे आहे, कोणाच्या पक्षात जायचे आहे ते सुज्ञपणे तुम्ही ठरवालच अशी आशा आहे! कराल ना एवढे?
अनुराधा दीक्षित