नवी दिल्ली
आता लवकरच सुरू होणाऱया सण-उत्सवांच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 200 जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सण-उत्सवांमध्ये प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वे प्रशासन 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या सण-उत्सवाच्या काळात 200 विशेष गाडय़ा चालवण्याचा विचार करीत आहे. तसेच गरज भासल्यास किंवा जास्त मागणी असल्यास अजून काही विशेष गाडय़ा सोडल्या जाऊ शकतात, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव यांनी येथे दिली. याशिवाय दसरा आणि दिवाळीपूर्वी देशातील पहिली खासगी ट्रेन तेजस ट्रकवर धावू शकते. आयआरसीटीसीने 17 ऑक्टोबरपासून तेजस सुरू करण्यास परवानगी मागितली आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्ग कमी झालेला नसला तरी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱया काही मार्गांवर 12 सप्टेंबरपासून अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. तसेच आम्ही विविध विभागांच्या अधिकाऱयांची बैठक घेतली असून त्यांनी स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे आणि सणासुदीच्या कालावधीत किती विशेष गाडय़ा चालवल्या जातील यावर निर्णय घेण्यात येईल, असे यादव यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाच्या गरजा आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता रेल्वेने प्रवासी सुविधांचा आढावा घेतला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रेल्वे मंत्रालयाकडून काळजी घेतली जाणार असली तरी रेल्वे प्रवाशांनी सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी रेल्वे विभागाला सहकार्य करायला हवे, असेही यादव यांनी पुढे स्पष्ट केले. सणासुदीच्या काळात प्रत्येक व्यस्त मार्गावर एक ते दोन क्लोन गाडय़ा चालवल्या जाण्याचे संकेत सध्या मिळाले आहेत.