सद्गुरुरूपी वैद्य शिष्याचा भवरोग संपूर्ण बरा करतो पण सद्गुरुंची कृपादृष्टी होण्यासाठी शिष्यही गुणसंपन्न हवा. नाथबाबा म्हणतात, देहाभिमान आणि ज्ञानाभिमान नसणे, दक्षता, निर्ममता, आप्तपणा, निश्चळता, परमार्थाविषयी चढत्या श्रेणीत वाटणारे प्रेम, अनसूया आणि मितभाषीपणा ही नऊ मण्यांची माळ शिष्याच्या हृदयकमली वास करते. शिष्याचे बोलणे अमृतासमान असते. आत्मसुख मिळण्याचे साधन तो एकाच शब्दात विचारतो. या नवरत्नांची सुंदर माळा जो शिष्य सद्गुरुंच्या कंठात घालील, तो हा हा म्हणता सायुज्यसिंहासनावर बसेल.
वरील नऊ गुण अंगी बाणवून उत्तम शिष्य होण्यासाठी काय काय करायला हवे ते भगवंत उद्धवाला सांगत आहेत. त्यात प्रामुख्याने निरपेक्ष कर्म करण्याचा समावेश आहे. भगवंत म्हणाले, बायका-मुलांच्यात राहून निरपेक्षतेने कर्म करणे कसे शक्मय आहे ते मी तुला सांगतो. सुखाबद्दल म्हणशील तर कुटुंबातील प्रत्येकालाच ते हवे असते पण सुख हे स्वतःतच आहे हे ज्ञानी साधकाने ओळखल्यामुळे बायका मुले, आप्त, इष्ट व संपत्ती यांच्याविषयी तो उदासीन असतो. माझे भक्त हे तत्त्वविचाराला धरून असल्याने घरादाराला आणि संसाराबाबत तटस्थ असतात. ते गुरुच्या चरणाला मिठी घालून प्रपंच बाजूला सारतात. देहात असून विदेहता, प्रपंचात असून तटस्थता अनुभवत असतात. आत्मा हा स्थूल व सूक्ष्म देहाहून सदासर्वदा भिन्न आहे. आत्मा म्हणजे मन नव्हे. मन हे एक इंद्रिय असल्याने स्वतंत्र नसते. आत्म्याच्या प्रकाशाने मन मोठय़ा वेगाने विचार करत असते.
सर्वप्रकाशक आणि अनादि देव आणि स्वयंप्रकाश-स्वभावी आत्मा तो मीच होय. अग्नी हा लाकडामध्येच राहतो पण त्याचे अस्तित्व स्वतंत्र असते. लाकडावर लाकडे घासली की तो प्रकट होतो आणि लागलीच त्या लाकडांना जाळून टाकतो. अग्नी जसा लाकडात असतो त्याप्रमाणे आत्माही देहातच असतो पण तो देह होऊन रहात नाही. तो ब्रह्मज्ञानाने प्रकाशला की लगेच माणसाची देहबुद्धी जाळून टाकतो. संसारबंधन छेदावयाला ब्रह्मविद्या हेच तीक्ष्ण खड्ग आहे असे तू समज. ब्रह्मविद्या प्राप्त होण्यासाठी जिज्ञासूने चित्ताला नेहमी स्थिर ठेवावे म्हणजे काय चूक काय बरोबर हे समजू लागते. सत्य आणि असत्याचे ज्ञान होते. त्यात असत्य जे आहे तेच अज्ञान होय. ते समूळ खणून काढण्यासाठी सद्विद्या उपयोगी पडते. सद्गुरुंची कृपा झाली की ब्रह्माने शरीर व्यापलेले आहे हे सद्विद्येने लक्षात येते.
देहबुद्धीचा विचार मनातून नाहीसा होतो म्हणजे एकप्रकारे देह असून नसल्यासारखा होतो. भगवंतांचे सांगणे सुस्पष्ट होते तरीही ब्रह्मविद्या प्रकट झाली की ती जर देहाचा नाश करत असेल तर ब्रह्मविद्या मिळवून काय उपयोग अशी शंका उद्धवाला आली. त्यावर भगवंत म्हणाले, नरदेहाचा आश्रय करून ब्रह्मविद्या वाढलेली असते. तेव्हा देहाचे निर्मूलन ती कशी करील? ब्रह्मविद्या ही गुरुशिष्याच्या संवादरूप मंथनाने (घर्षणाने) उत्पन्न होते. योगाला साध्य करण्याकरिता आठही प्रहर योगी कष्ट करीत असतात. गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखे मंथन (मनन) करीत रहावे, तेव्हाच ब्रह्मज्ञान प्रगट होते. निजबोधात दृष्टी स्थिर झाली म्हणजे तमाला रजोगुण प्राशन करतो. सत्त्वगुण रजोगुणाला गिळून टाकतो. शुद्धसत्त्वाच्या स्वभावामुळे आत्मसुखाचा अनुभव येतो. अशाप्रकारे रज तमाचे नामोनिशाणसुद्धा शिल्लक रहात नाही. असे झाले म्हणजे गुणांना उत्पन्न करणारी मायाही त्या शुद्ध सत्त्वात लय पावते.
देहाचा देहपणाच नाहीसा होतो. सर्व विश्व ब्रह्ममय असल्याची खात्री असल्याने ब्रह्मज्ञानी साधकाला इतर गोष्टींचे अस्तित्व तसेच देहाशी संबंधित असलेल्या रागलोभादी भावना जाणवत नसतात. तो सदासर्वकाळ ब्रह्मानंदात मश्गूल असतो. उद्धवा, थोडक्मयात अशी अवस्था प्राप्त झालेला परमात्मस्वरूपच असतो असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे. अशा स्थितीला वृत्ती जाऊन पोचली की, संसाराची निवृत्ती होते.