प्रतिनिधी/ वाई
किसनवीर कारखाना हा कार्यक्षेत्रातील समविचारीना एकत्र घेवून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी वाईत किसनवीर संदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या सभासद व शेतकऱयांच्या मेळाव्यात बोलताना जाहीर केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुबरे, राजेंद्रशेठ राजपुरे, नितीन भरगुडे-पाटील, दत्तनाना ढमाळ, बकजीराव पाटील, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, बाळासाहेब सोळस्कर, दिलीप पिसाळ, महादेव मस्कर, मनोज पवार, अनिल सावंत, अनिल जगताप, मकरंद मोटे, शामराव गाढवे, प्रदीप चोरगे, भारत खामकर, शशिकांत पवार, विक्रांत डोंगरे, सत्यजित वीर, एस वाय पवार, मंगेश धुमाळ, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मकरंद पुढे म्हणाले, किसनवीर सहकारी साखर कारखाना हा जिह्यातील सहकाराचा मनःबिंदू होता. किसनवीर आबांनी मोठय़ा दूरदृष्ठिने शेतकयांच्या हितासाठी चालू केला. तात्यांनी कारखाना सोडला तेव्हा अवघे साडेसहा कोटीचे नियमित कर्ज होते. स्व.लक्ष्मणराव पाटील कारखाना मोळाच्या ओढय़ावर नेहतील. त्यांना बेडया पडतील अश्या वलग्ना करण्यात आल्या. गेल्या वर्षीचे शेतकयांचे 55 हजार कोटी देणं बाकी असताना तसेच कामगारांचे दोन वर्षे पगार नाहीत, तरी कोणीही त्यांना जाब विचारायला जात नाही. आम्ही गेली अनेक वर्षे सांगत होतो मदन भोसले कारखाना बुडावातील पण लोकांनी विश्वास ठेवला नाही. परस्थिती बिकट आहे धरलं तर चावतंय, सोडल तर पळतंय. कारखाना बुडवून उजळ माथ्यानी फिरायला लाज कशी यांना वाटत नाही. अशी खरमरीत टीका मदन भोसले यांच्यावर आमदार पाटील यांनी केली.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, किसनवीरवर विविध बँकांची 352 कोटीची कर्जे व इतर 400 कोटींचा बोजा मिळून साडेसातशे कोटींचे कर्जे आहे. कारखान्यात अडीच कोटीची साखर शिल्लक आहे. तिन्ही कारखान्याची मिळून साडे सहाशे कोटी मालमत्ता व एक हजार कोटीची देणी. कोरोना नसता तर ही परस्थिती गेल्या वर्षी आली असती. बावीस महिन्यापासून कामगार पगार न घेता काम करत आहेत. एक हजार टनामागे दहा वर्षे कटिंग कराव लागेल. आमचं मदन भोसलेशी कसल ही साटेलोटे नाही. तालुक्यातील ऊस तुटवा म्हणून जरडेश्वर व शरयू यांच्या मागे लागून टोळ्या आणल्या. अजून सहा लाख टन ऊस शिल्लक आहे.
वसंतराव मानकुंबरे म्हणाले, किसनवीर चालवण्याची क्षमता नसताना प्रतापगड घेण्याची व खंडाळा कारखाना काढण्याची गरज नव्हती. घोटाळेबाज किसनवीरच्या विद्यमान अध्यक्षासह संचालकावर गुन्हे दाखल करा. यावर आमदार मकरंद पाटीलांनी मार्ग काढावा. यावेळी नितीन भूरगुडे- पाटील, शशिकांत पिसाळ, मा.आ.सदशिव सपकाळ प्रतापराव पवार यांनी मनोगतात आमदार मकरंद पाटील यांनी सभासद शेतकऱयांच्या हितासाठी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला.
वाई येथे किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी विषयी प्रथम प्रस्तविक राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कारखाना कार्यक्षेत्रातील विविध ऊसउत्पादक शेतकऱयांनी पोटतिडकीने ऊस उत्पादक शेतकऱयांची होणारी आर्थिक कोंडी याविषयी परखड मत मांडून कारखानाची निवडणुकी लढाविण्यासाठी साखडे घातले. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
निवडणूक तोंडावर आल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यांनीच कारखान्याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडून अजूनही शेतकयांची दिशाभूल चालू आहे, गेल्यावर्षी सहकार मंत्र्यांना थकहमी द्यायला लावली म्हणून कारखाना सुरु झाला. यावर्षी शासनाने राज्यात कोणालाच थकहमी दिली नाही. आपल्या पापाचे खापर आमच्या डोक्यावर फोडायचा प्रयत्न चालू आहे. तिन्ही कारखाने सुरु करण्याचा यक्ष प्रश्न आहे. आपल्याला मार्ग काढावा लागेल. निवडणूक जिंकल्यावर मोठी जबाबदारी आहे. तुम्ही सोबत असाल तर थकहमी उभी करून कारखाना चालू करू, जिवाच रान करू, इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून ठेवा, उमेदवारीचा अंतिम निर्णय जिल्यातील नेते बसून घेण्यात येईल.