समुद्र स्नानासाठी किनाऱयावर भाविकांची गर्दी
प्रतिनिधी / कारवार
कारवार तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील बावळ समुद्र किनाऱयावर समुद्र स्नान आणि विविध देवतांचा पालखी सोहळा मोठय़ा उत्साहात झाला. त्याचबरोबर माजाळी येथील सुप्रसिद्ध रामनाथ देवस्थानच्या शिवरात्रोत्सवाची सांगता झाली. प्रति गोकर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱया रामनाथ देवस्थानातील शिवरात्रोत्सवाच्या दरम्यान मंदिरातर्फे अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवरात्रीनंतरच्या अमावास्येच्या दुसऱया दिवशी समुद्र स्नानाचे आयोजन केले जाते. समुद्र स्नानासाठी कारवार तालुक्यातील सदाशिवगड येथील महामायाची, माजाळी आणि असनोटी येथील रामनाथांची, मुडगेरी आणि अंगडी येथील शिवनाथांची आणि कोळगे येथील श्री विठ्ठल-रखुमाईची अशा सात पालख्या समुद्र किनाऱयावर दाखल होत असतात. त्यामुळे केवळ कर्नाटकातीलच नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक पालख्यांच्या सोहळय़ात सहभागी होण्यासाठी आणि समुद्र स्नानासाठी अरबी समुद्राच्या बावळ येथील किनाऱयावर दाखल होत असतात. समुद्रात डुबकी घेतल्याने पाप परिहार होते, अशी श्रद्धाळूंची भावना आहे. त्यामुळे समुद्रात डुबकी घेऊन पालख्यांची पूजा आणि दर्शन घेण्यासाठी श्रद्धाळूंनी मोठी गर्दी केली होती.
समुद्र स्नानाचे औचित्य साधून किनाऱयावर दाखल झालेले श्रद्धाळू वाळूपासून शिवलिंग तयार करतात आणि श्रद्धेने त्या शिवलिंगाची पूजा करतात. समुद्र स्नानासाठी दाखल झालेले श्रद्धाळू केळी आणि इतर साहित्य समुद्राला अर्पण करतात हे साहित्य मिळविण्यासाठी मोठी शर्यत लागलेली असते. यामध्ये युवकांचा भरणा अधिक असतो. समुद्रस्नानाचा आनंद युवक, युवतीसह, अबालवृद्धांकडून लुटला जातो. उंच मानवी पिरॅमिड तयार करण्यासाठी युवकांच्या विविध चढाओढी लागलेल्या असतात. पिरॅमिड पाडण्याचे कार्य मात्र समुद्राच्या लाटा करतात.
पडीची परंपरा अबाधित
समुद्र स्नानासाठी किनारपट्टीवर दाखल होणाऱया विविध देवस्थानांच्या पालखी सोहळय़ाच्या निमित्ताने अनेक परंपरा टिकवून ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी एक परंपरा म्हणजे पड (तांदूळ) अर्पण करायची परंपरा. पालख्या समुद्रस्नानासाठी जाणाऱया रस्त्याच्या दोन्ही बाजूला गोसावी समाजातील बांधवांकडून साडय़ा अंथरुण ठेवलेल्या असतात. अंथरुण ठेवलेल्या साडय़ावर पड (तांदूळ) अर्पण केले जातात. पूर्वीच्या काळात ज्यावेळी पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात नव्हता अशावेळी केवळ तांदळाच्या रुपाने अर्पण केली जात होती, असे सांगण्यात आले. तथापि अलीकडच्या काळात पैशाच्या रुपाने पड अर्पण केली जाते. पड अर्पण करण्याच्या परंपरेकडे श्रद्धाळू आणि गोसावी समाजबांधव श्रद्धेने बघत असतात.
सोहळय़ाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांची बारीक नजर
समुद्र स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. स्नानाचा आनंद लुटणारे श्रद्धाळू विशेष करून युवावर्ग समुद्रात नको ते धाडस करत असतो. दूरवरच्या ठिकाणाहून दाखल होऊन समुद्र स्नानात सहभागी झालेल्या भाविकांना समुद्रातील पाण्याच्या लाटांची योग्य ती माहिती नसते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडून समुद्र स्नान आणि पालखी सोहळय़ाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस आणि भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी बारीक नजर ठेवून होते. गोवा आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे यावर्षी समुद्र स्नानासाठी दाखल होणाऱयांची संख्या थोडीशी ठप्प झाल्याचे दिसून आले.