पत्रकार राजू भिकारो नाईक
सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा
संगीत आणि सांस्कृतिक विषयाच्या माध्यमातून खूप मोठी चळवळ ज्या संस्थेने सुरू केली, गेल्या चार तपाहून अधिक काळ संस्थेचा डोलारा समर्थपणे सांभाळला त्या सम्राट क्लबची यशोगाथा संस्थेच्याच संस्थापक सदस्याने लिहावी यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असूच शकत नाही, असे उद्गार दै. तरूण भारतचे संपादकीय विभागाचे प्रमुख राजू भिकारो नाईक यांनी ‘सम्राट क्लबची यशोगाथा’ या पुस्तकाच्या चर्चेच्या कार्यक्रमात काढले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी आणि प्रागतिक विचार मंच गोवा या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सम्राट दिवाकर शिंक्रे यांनी लिहिलेल्या पुस्तकावरील चर्चेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. फोंडय़ातील थ्रिफ्ट सोसायटीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर राजू भिकारो नाईक यांच्यासमवेत पुस्तकाचे लेखक दिवाकर शिंक्रे, रमेश वंसकर, जयवंत आडपईकर, माधूरी उसगांवकर व साळू भगत उपस्थित होते.
सम्राट क्लबने संगीत, नाटय़, नृत्य आदी सगळय़ाच कलाप्रकारांचा विकास घडविलेला आहे. त्याचे प्रतिबिंब शिंक्रेच्या पुस्तकात दिसते. मान, सन्मान, उपहास, अपमान, अडचणी, इशकृपा, चमत्कार या सगळय़ाच गोष्टी चोखंदळपणे लेखकाने आपल्या पुस्तकात अंतर्भुत केल्यामुळे सम्राट क्लब चा एक उत्तम दस्तऐवज कींवा या संस्थेचा पुर्ण इतिहासच या पुस्तकाच्या माध्यमातून जाणवतो, असे राजू नाईक म्हणाले.
कलाकारांप्रती कृतज्ञता, कलाकारांना पुरस्कार देण्याबरोबरच गोव्यातील उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्य़ासाठीची सम्राटाची धडपड उल्लेखनीय आणि वाखणण्याजोगी असल्याचे सांगताना, सम्राटची परंपरा विस्ताराने या पुस्तकात सामाविष्ट केल्याबद्दल त्यांनी लेखकाचे अभिनंदन केले.
माधुरी उसगांवकर
सम्राट क्लबचे संस्थापक सदस्य आणि कार्यकर्त्याना अनेकवेळ अग्निदिव्यातून जावे लागल्यामुळे संस्थेचे कार्य अधिक जोमाने आणि अधिक नेटाने पुढे नेण्याची प्रेरणा सम्राटला प्राप्त झाली. सम्राटच्या कार्यात आलेले संमिश्र अनुभव अत्यंत प्रभावी शैलीत मांडल्याबद्दल त्यांनी शिंक्रेचे लिखाण यशस्वी झाल्याची भावना व्यक्त केली.
मोठेपणा मिरवू नका, संस्थापक सम्राटला विसरू नका-रमेश वंसकर
चर्चेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना रमेश वंसकर म्हणाले की आपण सम्राटच्या इतिहासाचे साक्षीदार असून सम्राटच्या कार्यात शिंक्रे बंधूचे योगदान हे हे ‘न भूतो न भविष्यती’ असेच आहे. लेखकाला आलेल्या अनुभवांचे मुल्यमापन आणि लेखाजोखा पुस्तकातून विस्तृतपणे मांडला गेल्याचे सांगताना हे पुस्तक म्हणजेच सम्राटच्या क्रांतीकारक पर्वाचा पुरावाच ठरावा असे ते म्हणाले.
जयवंत आडपईकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अनिता तिळवे यांनी सुत्रसंचालन केले तर दुर्गाकुमार नावती यांनी आभार मानले.