कोरोना परिस्थितीमुळे राज्य सरकारचा आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात अत्यावश्यक सेवा पुरविणारे 7 खाते वगळता उर्वरित सर्व खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱयांना रोटेशन पद्धतीने दररोज 50 टक्के उपस्थितीप्रमाणे कार्यालयीन कामासाठी हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी सोमवारी हा आदेश जारी केला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खात्यांमधील अधिकारी आणि कर्मचाऱयांना कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती दर्शविण्याची सूचना करण्यात आली आहे. कार्यालयीन हजेरीसाठी रोटेशन पद्धतीचा अवलंब करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते, वैद्यकीय शिक्षण, अंतर्गत प्रशासन, कामगार खाते, ग्रामविकास आणि पंचायतराज, महिला आणि बालकल्याण व महसूल खात्यातील कर्मचाऱयांना मात्र, सूट देण्यात आलेली नाही. या खात्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या खात्यांच्या कार्यालयांमधील कर्मचाऱयांची उपस्थिती 100 टक्क्क असणार आहे. नगरविकास, अन्न-नागरी पुरवठा, ऊर्जा, कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा, अर्थ, पशूसंगोपन व मत्स्योद्योग, कृषी, बागायत, वाणिज्य आणि उद्योग खात्यांमधील कर्मचारी, अधिकाऱयांना 50 टक्के उपस्थितीचे निर्देश देण्यात आले आहेत. 23 मे पर्यंत हा आदेश जारी राहणार आहे.