12 जानेवारी हा स्व. पं. कुमार गंधर्वांच्या पुण्यस्मरणाचा दिवस! समाजमाध्यमांवर या निमित्ताने त्यांच्या आठवणी, सांगीतिक क्षेत्रातले त्यांचे कार्य, योगदान, असंख्य दुर्मिळ फोटो आणि व्हीडिओ, व्हर्चुअल संगीत मैफिली, अशा अनेक गोष्टी शेअर करून जणु त्यांचे स्मृतिश्राद्धच केले गेले. या व्यतिरिक्त त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्यक्ष कार्यक्रमही आता साजरे झाले असतील किंवा होत असतील. त्यानिमित्ताने त्यांनी निर्मिलेल्या रागांच्या बंदिशीही ऐकायला मिळाल्या. त्यातल्या एका बंदिशीने बेचैन करून सोडले. तिचे शब्द होते, काहे रे जगावा सोने दे सोने दे आणि तिची जन्मकथा जेव्हा वाचनात आली तेव्हा तर आणखी विचारमग्न व्हायला झाले. ती येणेप्रमाणे. जेव्हा पं. कुमारजी असाध्य दुखण्याने ग्रस्त होते, तेव्हा त्या अवस्थेतही ते सतत अभ्यास करत होते. मालवती, मघवा, मधुसुरजा, बीहड भैरव, लगन गांधार यासारख्या कित्येक धूनउगम रागांचा जन्म याच काळात त्यांच्या सृजनशील मनातून झाला अशी माहिती पुलंच्या ‘मंगल दिन आज’ या कुमारजींवरील लेखातून मिळते. तर त्या धुनांच्या शोधात आपल्या सौभाग्यवती भानुमतीजी यांच्यासह ते माळव्यात भ्रमंती करीत असत. एके दिवशी पहाटे त्याच मोहिमेवर जाण्यासाठी त्यांनी भानुमती यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता भानुमतींच्या तोंडून ‘काहे रे जगावा’ हे शब्द उमटले. त्याक्षणी कुमारांची कलानायक वृत्ती जागृत होऊन एक पूर्ण राग जन्माला येण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याचे नावही अत्यंत समर्पक आणि चित्तवेधक आहे. ‘सहेली तोडी’. आपल्या सहचरीमुळे सुचलेला राग म्हणून त्यात ‘सहेली’ आणि उषःकालीन म्हणून तोडीचा प्रकार असे हे उत्स्फूर्त कॉम्बिनेशन असावे. महान कलाकार हे महान खरेच, पण ते ऐकणारे आणि त्या उंचीवर जाऊन समजू शकणारे श्रोतेही किती महान आणि अर्थातच दुर्मिळ असतील? कारण हा राग ‘बिलासखानी तोडी’ या तोडीच्या प्रकाराच्या फारच जवळचा असून त्याच स्वरात आणि त्याच थाटातही त्याचा मूड आणि अस्तित्त्व स्पष्ट आणि स्वतंत्र घडवणे हे काम अतीव अवघड आहे असे अनेक संगीत समीक्षकांनी नमूद केले आहे. आश्चर्य असे की या कुठल्याही भानगडीत न पडणाऱया सर्वसामान्य श्रोत्यांनी जर ही बंदिश शांतपणे ऐकली तर खरोखरच सुषुम्नावस्थेत किंवा अर्धजागृतावस्थेत असणाऱया व्यक्तीचा मूड अक्षरशः चित्रित केलेला जाणवेल. काय ताकद असते घडवणाऱयांची! अडाणी (आणि प्रामाणिक) श्रोत्यालाही जाणवेल आणि जाणत्याला अचंबित करून सोडेल. सततोद्यमी आणि प्रतिभावंत कलाकारांच्या हातून सहज म्हणून होते तीच उच्च कोटीची नवनिर्मिती असते. ते सहज गुणगुणले तरीही एखादा नवीन राग निर्माण होतो. सहज पडावे आणि दंडवत घडावे इतकी ही सहजोर्मी असते. अशा व्यक्तींना आपल्या हातून काही महान घडते आहे याची जाणीवही नसते. कारण अहोरात्र त्यांना ध्यासच असा असतो की ते फक्त व्यक्त होत जातात. त्याचे हिशेब मग कधी श्रोते तर कधी समीक्षक मांडत असतात. आणि त्याचवेळी हे निर्माते कलाकार आपल्या बहुप्रसवा असणाऱया असमाधानी प्रतिभेशी भांडत असतात.
एखाद्या अत्यंत रूक्ष वाटणाऱया शब्दातून घडलेले गाणे, ज्याला गीत म्हणून मान्य करण्याचीही संगीतकाराची तयारी नव्हती. ‘लगेजवाला गाना’ म्हणून सर्वांकडून टर उडवले गेलेले तेच गाणे असामान्य अभिव्यक्ती करणारी चाल लागून ‘मेरा कुछ सामान’ या नावाने जवळपास चिरंजीव का बरं होत असेल? मोठाच प्रश्न आहे. ’एक सौ सोलह चांद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल’ या ओळी नुसत्याच वाचल्या तर काही म्हणून काही संदर्भ लागायचा नाही. पण त्याच गाण्यातून ऐकल्या की सर्वस्व गमावून प्रियकरापासून नाईलाजाने दूर झालेल्या प्रेयसीचा मूक आक्रोश त्या सुरांतून अंगावर कोसळतो. तेवढय़ा दोन ओळीत त्यांनी एकत्र घालवलेल्या अनेक आनंदी क्षणांच्या उत्कट आठवणी चमकून जातात. खरंच या कवितेत किती मोठा आशय आहे! गुलजारसाहेब आणि पंचमदा उपाख्य आर.डी. या दोघांनाही अदृष्टात सतत पाहण्याची जी दृष्टी देणगी म्हणून मिळाली होती त्याचाच हा उत्स्फूर्त आविष्कार नव्हे का? त्यांच्याही नकळत ते सहज अतीव सुंदर गानशिल्प घडवून पुढे गेले. ते प्रचंड लोकप्रिय झाले कारण ‘ती’ वेदना सहज ये हृदयीची ते हृदयी पोहोचली म्हणूनच. अतिशय सामान्य वाटणाऱया गोष्टी, दृश्ये, माणसं यांच्यात दडलेल्या असामान्य प्रतिमा प्रत्यक्षात आणायला तशाच अत्युच्च दर्जाची प्रतिभा असावी लागते. तेव्हा अशांनी केलेला सहज चाळाही निर्मिती असते. नव्हे नव्हे त्यांना आलेला कंटाळाही नवनिर्मितीचे कारण म्हणून येतो. पं. सी. आर. व्यासांना धनकोनि कल्याण हा राग अशाचप्रकारे प्राप्त झाला होता याची त्याची कूळकथा पं. राजदत्त तथा बाळ आंबर्डेकर यांच्या एका मैफिलीत त्यांनी सांगितली. रियाजाला बसल्यावेळी नेहमीप्रमाणे चित्त एकाग्र होईना. त्यातून मनासारखे स्वर लागेनात आणि भलतेच स्वर लागून जे झाले तो चक्क एक अख्खा राग जन्माला आला. आहे की नाही गंमत? याही रागाचे नाव मोठे मार्मिक आहे! धनकोनि म्हणजे ध न अर्थात धैवत नाही, आणि को नि म्हणजेच कोमल निषाद असलेला पण कल्याण थाटातला सर्वस्वी वेगळा राग घडला. हेच ते सहज गायन तरी बीजमंत्र! एखाद्या घरातला माणूस मेल्यानंतर तिथे बायामाणसं मोठमोठय़ाने सूर काढून रडत आहेत, यात कुठेही संगीत असण्याची शक्मयताच नाही. कारण हा प्रसंगच अतीव गंभीर आहे. करुण आहे. पण अशाच माजा तो बाबा रं।़।़।़ कुटं तो ग्येला रं।़।़।़ अशा विलापातून संगीतकार राम कदम यांना ‘बुगडी माझी सांडली गं’ या प्रचंड लोकप्रिय लावणीची चाल सुचली होती यावर कोण विश्वास ठेवेल? पण ही त्यांनीच उल्लेख केलेली गोष्ट आहे म्हणून बरं. मनातली धून सतत सुरू असल्याने नकळत किंवा सर्वस्वी विपरीत परिस्थितीतही अशी नवनिर्मिती होत असते. काचेचे ग्लास एकमेकांवर नाजूकपणे आपटल्यावर किणकिणाट होतो हे खरं आहे पण या आवाजातून एक म्युझिक पीस तयार करायचा म्हणजे काय कमाल म्हणावी? ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ ची सुरुवात आठवा. दिसायला या सगळय़ाच गोष्टी अगदी विपरीत किंवा सामान्य. पण यातले असामान्यत्त्वाचे बीज हे ‘चित्ती असो द्यावे नादभान’ अशा वृत्तीच्या कलाकारांच्या ओंजळीत आपण होऊन येऊन पडते. प्रसिद्ध कवी गीतकार शंकर रामाणी यांना स्वतःच्या अत्यवस्थ पत्नीला हॉस्पिटलमध्ये हलवताना ‘दिवे लागले रे दिवे लागले’ सारखे कमाल गीत सुचले होते. ते त्यावेळी किती अस्वस्थ असतील, किती चिंताग्रस्त असतील? पण त्या गोष्टींना न जुमानताच ते गीत बाहेर पडलेच. कारण एकच, निदिध्यास घेणे. निशिदिन असणारा ध्यास तो निदिध्यास! जो पं. अभिषेकीबुवांनी आपल्या शिष्यांना आणि गानप्रेमींना बाळगायला सांगितला होता. जेव्हा निर्मिती सहज असते तेव्हा प्रतिभा व चिंतन मनन अभ्यास हे सह‘ज’ म्हणजे बरोबरच जन्माला आलेले पाठल्या फळीचे शिलेदार असतात.
अपर्णा परांजपे-प्रभु : 8208606579