माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचा सवाल
प्रतिनिधी / विटा
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे, यासाठी खानापूर येथे जागेची पाहणी झाली. जागा, पाणी, राज्यमार्ग अशा सुविधा आणि लोकभावना असताना खानापूरला उपकेंद्र का नको? याचे योग्य कारण सांगितले पाहिजे. बस्तवडेला जागेची पाहणी देखिल झालेली नसताना तत्त्वतः मंजूरी दिली जाते. त्याच पक्षाचे मंत्री असताना लोकप्रितनिधींना याची माहिती नसते? असा सवाल करीत राजकीय इच्छाशक्ती असेल तर लोकप्रितनिधींनी खानापूरला विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असा टोला माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
उपकेंद्र मागणीसाठी रास्ता रोकोचा इशारा
राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे म्हणाले, आम्हाला या विषयाचे राजकारण करायचे नाही. आटपाडी, खानापूर, खटाव आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांना खानापूर सोयीचे होणार आहे. दुष्काळी भागात रोजगार उपलब्ध होणार आहे. आम्ही आमच्या पातळीवर माजी आमदार सदाशिव पाटील, मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. मात्र खानापूरला उपकेंद्र का नको? याचा खुलासा झाला पाहिजे. खानापूरसाठी तत्कालीन कुलगुरू डा. एन. जे. पवार यांच्या कालावधीत २०१२ पासून पाठपुरावा सुरू असताना अचानक बस्तवडेला तत्त्वतः मान्यता कशी मिळाली? याचे उत्तर मिळाले पाहिजे. उपकेंद्र झाल्यास घाटमाथ्याचा विकास होणार आहे. त्यामुळे या मागणीसाठी उद्या सोमवारी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.