45 वर्षावरील सव्वापाच लाख नागरिकांना लस देणार : आगामी वीस दिवसांचा काळ जोखमीचा : जिल्हाधिकारी
प्रतिनिधी/सांगली
कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. पण निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आगामी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी कोरोनाच्या दृष्टीने जोखमीचा आहे. त्यामुळे 45 वर्षावरील नागरिकांना आजपासून लसीकरण 227 केंद्रामधून लसीकरण सुरू करण्यात आले असून महिन्याभरात सव्वापाच लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, प्रशासनाची तयारी आणि लसीकरणाचे नियोजना आदी संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदी उपस्थित होते. सध्या कोरोना प्रतिबंध लस आणि नियमांचे काटेकोर पालन हेच उपाय असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी म्हणाले, कोणताही गैरसमज न करता जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
बाधित झाल्यास तीव्रता कमी
राज्य शासनाने 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केलेले आहे. जिह्यात 111 आरोग्य केंद्रावरून लसीकरण सुरू असून नव्याने 116 लसीकरण केंद्रांची भर पडली आहे. जिह्यात 227 केंद्रावरून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट झपाटÎाने वाढत असून येणारा पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी हा कोरोनाच्या दृष्टीने अतिशय जोखमीचा आहे. शासनाने 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून जिह्यातील या वयोगटातील नागरिकांनी मोठÎा प्रमाणावर लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अत्यल्प आहे. तसेच प्रादुर्भाव झाला तरी कोरोनाची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होऊन पर्यायाने पुढील संभाव्य अप्रिय घटना व धोके टाळण्यासाठी लसीकरणामुळे मदत होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी 45 वर्षावरील नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
महिन्यात सव्वापाच लाख लोकांना लसीकरण
ज्या जिह्यामध्ये लसीकरणाचा वेग जास्त आहे, त्या जिह्यांना आवश्यक लसींचे डोसेस्ही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिह्यात 45 वर्षावरील सुमारे 6 लाख 30 हजार नागरिक आहेत. यापैकी एक लाख 42 हजारांना पहिला तर 17934 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित सव्वापाच लाख लोकांना येत्या महिन्याभरात लसीकरणाचे उद्दीष्ट आहे. प्रशासन प्रयत्नशील आहेच परंतु सामाजिक संस्थांनीही या वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.
निर्बंध कडक करणार
मास्क न वापरणाऱया आणि कोव्हिड नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर धडक कारवाई सुरू आहे. केवळ 20 फेब्रुवारी ते मार्च अखेर जिह्यात 40 लाख 90 हजार रूपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख 68 हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आला आहे. दंड वसूल करणे हे प्रशासनाचे ध्येय नसून नागरिकांची सुरक्षा हेच अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा.
पॉझिटिव्ह रेट 5 टक्क्यांच्या खाली
जिह्याचा पॉझिटिव्ह रेट जानेवारी 2021 पासून 3.28 असून येत्या काळात कोरोना प्रादुर्भाव वाढणार हे निश्चित असल्याने शासकीय रूग्णालयांबरोबरच खाजगी रूग्णालयेही कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वीत करण्यात येत आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीत असणारी हॉस्पीटलही पुन्हा कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आली आहेत.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली, मिरज चेस्ट सेंटर मिरज, वाळवेकर हॉस्पीटल सांगली, विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ऍण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली, वॉन्लेस हॉस्पिटल मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज या ठिकाणी उपचार सुरू आहेत. जिह्यात ऑक्सिजन साठा पुरेसा आहे. खासगी आणि शासकीय रूग्णालयांत तीन हजारांवर बेडची तयारी करण्यात आली आहे. पण बेड भरू नयेत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला हे लक्षात घेऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी जाताना कोणतेही फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी) घेऊन जावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.