वार्ताहर / कसबे डिग्रज
पाणलोट क्षेत्रातील सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मिरज पश्चिम भागातील गावांमध्ये भेटी देऊन पाहणी केली. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुराने कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी परिसरात गंभीर रूप धारण केले आहे.
पूरग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान बोलताना जयंत पाटील म्हणाले, पाणलोट क्षेत्रांतील अतिवृष्टीमुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात अचानक वाढ झाल्याने कोयनेतून टप्प्याटप्प्याने विसर्ग करण्यात आला आहे. पुढे अलमट्टी धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने परिस्थितीवर काही प्रमाणात आपण नियंत्रण करत आहोत. परंतु सततच्या मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात अडथळा येत आहे. सध्या पाण्याचा वेग जास्त आहे त्यामुळे पाण्यात जाऊ नका, आरोग्याची काळजी घ्या, सतर्क रहा, तसेच महापुरात ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.