अभ्यास अपूर्ण राहिल्याने लढवली शक्कल
पलूस / प्रतिनिधी
बुर्ली येथील दोन शालेय विद्यार्थ्यांनी आपले अपहरण करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती पालकांना दिली. पालकांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या इसामांचा शोध घेण्यासाठी सिसिटिव्ही फुटेजद्वारे माहिती घेण्यास सुरूवात केली. मात्र पोलिसांच्या चार तासाच्या प्रयत्नानंतर हा विद्यार्थ्यांनी केलेला बनाव असल्याचे उघड होताच सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
बुर्ली येथील दौलतगिरी विद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. शाळेत जाताना आपण भिलवडी येथे . एस.टी. बस सेवा बंद असल्याचे सांगून रस्त्यावरून जाणाऱ्या मोटारसायकस्वारांना हात करून त्यांच्या गाडीवर बसवून भिलवडी-औदुंबर इथेपर्यंत प्रवास करुन पालकांना आपले अपहरण झाले असल्याचे भासवले. घाबरलेल्या पालकांनी पोलिसांना घडला प्रकार सांगताच सुरूवातीला पोलिसही चक्रावले. पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ धनवडे, प्रविण गोरे, विशाल चंद यांनी तपास सुरू केला असता सी.सी.टीव्ही फुटेज तपासताना सदरची दोन्ही मुले एका मोटारसायस्वारांच्या पाठीमागे बसून गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी एकीकडे तपास व दुसरीकडे चौकशी सुरू केली असता हा चक्क बनाव असल्याचे उघड झाले.
शाळेतील स्वाध्याय अपूर्ण राहिला आहे. ही बाब शाळेत गेल्यानंतर शिक्षकांच्या समोर उघड होणार आणि घरी पालकांना समजले तर पालक आपल्याला रागावणार या भितीने विद्यार्थ्यांनी आपले अपहरण झाले असल्याचा बनाव आम्ही रचला असल्याची कबुली विद्यार्थ्यांनी दिली. शाळेतील अपूर्ण राहिलेला अभ्यास व भिती या पोटी विद्यार्थ्याच्या कल्पनेतून रचलेली कहाणी ऐकूण सर्वजण अवाक् झाले. पोलिसांना झालेल्या त्रासाबद्दल शाळेतील शिक्षक व पालकांनी पोलिसांचा सत्कार करून क्षमा मागितली.