ऑनलाईन टीम / मुंबई :
वाढत्या शहरीकरणामुळे मोठय़ा शहरांमध्ये शेतजमिनी शिल्लक राहिल्या नाहीत. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सातबारा रद्द करुन प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
शेतजमिनीचा आकार, त्याचा मालकी हक्क आणि इतर काही बाबींची माहीती ज्यावर असते, त्या दस्तऐवजाला सातबारा म्हटले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे मोठमोठय़ा शहरांमध्ये आता जमिनी शिल्लक नाहीत. त्यामुळे राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्यात येणार आहे. करचुकवेगिरी तसेच फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला काही शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी होईल. तेथील प्रयोगाच्या यशापयशाची चाचपणी करुन त्यानंतर राज्यभरात त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.