औंध / प्रतिनिधी
अंभेरी ता. खटाव येथील 54 वर्षीय कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. गावातील मुंबईवरून आलेल्यांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. प्रशासनाने आता 14 दिवस गाव सील केले आहे.
अभेरी येथील चौघेजण मुंबईतून 17 मे रोजी गावी आले होते. त्या चौघांना ग्रामस्तरीय कमेटीने गावात होमक्वारंटाईन केले होते. मात्र चौघापैकी एका 55 वर्षाचे व्यक्तीला ताप सर्दी लक्षणे जाणवू लागल्याने काल तो औंध ग्रामीण रुग्णालयात तपासणी साठी गेला होता. मात्र त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्याला सातारा येथील विलगीकरणकक्षात पाठवले होते. बाधिताचा अहवाल पाँझेटीव्ह आल्यामुळे व त्याच्या बरोबरचे तीघेजण आणि सहवासित 22 जणांना पुसेगाव येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. गावात बाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तातडीने तहसीलदार डॉ अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ युनुस शेख, सपोनि उत्तम भापकर यांनी अंभेरीला भेट दिली आणि ग्रामस्थांना सुचना देऊन गाव चौदा दिवसासाठी सील करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागाचे वतीने घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. मात्र प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांनी केले आहे.