हंडाभर पाण्यासाठी रात्रभर जागरण
वार्ताहर / कास :
डोंगरपठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढल्याने झऱ्याचे पाणी कमी होऊन पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण होत आहे. कुसुंबीमुरा (जावली) येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांनाही तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र -रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. रात्री उंचकड्याकपारीत झऱ्याचे पाणी मिळवण्याच्या कसरतीतून पाय घसरूण विपरित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेकडो जनावरांनादेखील पाणीटंचाईच्या समस्येशी संघर्ष करावा लागत आहे.
डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी जास्त प्रमाणावर वाहून जाते. परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील 24 कुंटुबे असणाऱ्या आणि आखाडेवाडीतील 150- 200 लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. ज्या झऱ्यातुन पाणी टाकीत सोडले जात होते त्या झऱ्याचेच पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवड्यात झऱ्यातुन टाकीत येणारा पाणीपुरवठा बंद झाला.
सद्यस्थितीला झऱ्याचे पाणी मोठ्याप्रमाणावर कमी होऊन डोंगरातील एकुण तीन – चार झऱ्यावर दोनशे-अडीचशे फूट खोल कडयालगत रात्रंदिवस पाणी भरण्यासाठी महिला आणि पुरुषमंडळी दिसत आहेत. डोंगरदरी, झाडाझुडपाच्या मार्गाने छोट्या भांड्याने लहानगे, महिला पाण्यासाठी धडपडत आहेत. पावसाळा सुरू व्हायला बराचसा कालावधी असून, वेळेत पाऊस पडला तर ठीक, अन्यथा पठारावरील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
ग्रामस्थ शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत असुन दिवसभर लहानगे भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकुन आहेत. झरा लोकवस्तीपासुन काही अंतरावर असल्यामुळे आपल्या कुंटुबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातुन कडक उन्हात डोक्यावरून पाणी भरावे लागत आहे.डोंगरउतारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्याने उंचमाथ्यावर आखाडेवाडी असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.