प्रतिनिधी / सातारा
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जास्तच भयावह परिस्थिती झाली असल्याकारणाने रुग्णसंख्येत जिल्ह्यात झपाट्याने वाढ होत आहे. या महामारीच्या संकटांवर मात करण्यासाठी काँग्रेस पक्षाने सामाजिक जाणीव व दायित्वाच्या भूमिकेतून जनजागरण करून कोविड रुग्णांना वैद्यकीय मदत व सहायता करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेसच्यावतीने सातारा येथील मुख्यालयात कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या कोविड मदत केंद्राचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांचे हस्ते सोमवार दि. १२ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सर्व नियम व अटींचे पालन करून उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोले, राज्यप्रभारी एच. के. पाटील यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा काँग्रेस मुख्यालयात जिल्हा कोविड मदत व साहाय्य केंद्र सुरु करून कोरोना मुक्त गाव व वॉर्ड मोहीम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय सहाय्य उपलब्ध व्हावा यासाठी आपली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
कोविड सहाय्यता व मदत केंद्राद्वारे कोरोना बेड, ऑक्सिजन, रक्त, प्लाज्मा, रेमडीसीवीरसह आवश्यक औषध उपलब्ध करून देणे व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तसेच स्थानिक पातळीवर प्रशासकीय मदत मिळत नसेल तर महाराष्ट्र शासनाचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, अरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, यांचेशी संपर्क करून रुग्णांना मदत करण्यात येणार आहे.
यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण सूचनेवरून जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी जिल्हा काँग्रेसची ‘टास्क टीम’ तयार केली असून या टीममध्ये जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते खजिनदार बाबासाहेब कदम (९४२२४००५४२) जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई (९९६०३५०९९९), ऍड. दत्तात्रय धनावडे (९८९०७१६११२), सौ. धनश्रीताई महाडिक (९८८१९८६००८), मनोजकुमार तपासे (८६६८२६७९६५), ऍड, श्रीकांत चव्हाण (९८२२४२५४५८) काम करणार आहेत. हि टीम कोरोना रुग्णांच्या सहकार्यासाठी २४x ७ यावेळेत काम करणार असून कोरोना व नातेवाईक यांना मदत लागल्यास टीम मधील कोणासही संपर्क करून मदत घेऊ शकतात.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून राज्याच्या प्रदेश पातळीवरून जनजागरण मोहीम सुरु असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘टास्क टीम’शी संपर्क करून आपल्या गावातील, वॉर्डातील तालुक्यातील रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हा काँग्रेसकडून करण्यात आले आहे.