अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 21 एप्रिल 21 दुपारी 12.30
● आकडा 1 हजार 695 वर ● रेमडेसिवीर मिळू लागले पण वापर अनियंत्रित ● मृत्युदर 1.77 पर्यंत वाढला ● होम आयसोलेशकडे वाढता कल ● पॉझिटिव्ही रेट वाढल्याने लॉकडाऊनची मानसिकता
सातारा / प्रतिनिधी :
दैनंदिन वाढ होत चाललेला आकडा बुधवारी 1 हजार 695 वर गेला. आता “उच्चांक” म्हणण्याची ही सोय राहिली नाही. वाढत चाललेले आकडे कधी स्थिरावताहेत किंवा कमी येऊन दुसरी लाट ओसरू लागल्याची चाहूल देताहेत याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
अजून 3 ते 4 आठवडे तरी भयानक परिस्थिती
जानेवारीत आकडे मंदावले असताना अचूक बातमीच्या माध्यमातून “तरुण भारत”ने सप्टेंबरनंतर 150 दिवसांनी दुसरी लाट येण्याचे निरीक्षण नोंदवले होते. ते तंतोतंत ठरले.
दरम्यान, लसीकरण सुरू असले तरी महाराष्ट्रातील ही लाट ओसारण्यासाठी फेब्रुवारीच्या अर्ध्यातून किमान 80 ते 100 दिवस लागतील असेही एक निरीक्षण आहे. त्यामुळे अजून 3 आठवडे तरी सामाजिक सतर्कता बाळगावीच लागणार आहे.
दीड हजारावर पोहोचलेला सातारा जिल्ह्याचा आकडा 1,695 गेला असला तरी याला उच्चांक म्हणे पर्यंत पुढचा आकडा काय असेल हे आत्ताच सांगता येत नसल्यासारखी अवस्था आहे.
कडक लॉकडाऊनची होतेय मानसिकता
आजवरचा पॉझिटिव्हीटी दर 23.18 असला तरी सध्या तो 30 च्या जवळ म्हणजे 28 वर गेला आहे. त्यामूळे बाहेर गर्दीत उभा असाल तर लक्षात असू दे की तुमच्या चारही बाजूला एक-एक पॉझिटिव्ह रुग्ण उभा आहे. किंबहुना लोकांच्या आता हीच बाब प्रकर्षाने जाणवू लागल्याने कडक लॉकडाऊनची मानसिकता होऊ लागली आहे.
रेमडेसिवीर होऊ लागले उपलब्ध पण….
औषध कंपन्यांचे दुप्पट उत्पादन सुरू झाले असून त्याची पहिली बॅच जिल्ह्यात दाखल होऊ लागली आहे. त्यामुळे नातेवाईकांची धावपळ कमी होईल असे वाटते.
लक्षात असू द्या की 17 टक्के मृत्यू हे रेमडेसिवीरने
रेमडेसिवीर चा प्रचंड वापर हा अतिशय धोकादायक असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचे केवळ राजकारण सुरू आहे. राज्यातच करण्यात आलेल्या एका स्टेडिवरून राज्यातल्या दुसऱ्या लाटेत 17 मृत्यू हे रेमडेसिवीरच्या अतिरिक्त वापराने झाल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र वगळता इतर काही राज्यांनी त्यावर खुप मर्यादा आणल्या आहेत. महाराष्ट्रात रेमडेसिवीर बाबत लोकांच्या भावना तीव्र झाल्याने त्याच्या विपरीत परिणामांकडे दुर्लक्ष करून शासन त्याचा भरमसाठ पुरवठा करू लागले आहे. यात जनतेच्या काळजीपेक्षा आग्रहकडे लक्ष दिल्याचे जाणवते.अश्यावेळी नातेवाईकांनी योग्य वैद्यकीय सल्ला घेऊनच आग्रह धरणे रास्त ठरेल.
तब्बल 42 बाधितांचा मृत्यू
जिल्हय़ात बाधितांचे आकडे वाढल्यानंतर मृत्यूही वाढत चालले आहेत. गेल्या चोवीस तासात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही उच्चांकी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील स्थितीपेक्षा सध्याचे आकडे चिंता वाढवणारे येत आहेत.
पूर्ण टाळेबंदीच्या घोषणेकडे लक्ष
राज्यात परिस्थिती हाताबाहेर चालल्याने राज्य सरकार टाळेबंदी आणखी कडक करण्याच्या दिशेने पावले उचलत आहेत. आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असून ते काय घोषणा करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.