सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांचा आरोप
प्रतिनिधी/ सातारा
सातारा विकास आघाडीच्यावतीने कामे करताना त्याची झळ पालिकेला सोसावी लागणार आहे पुढे लावलेले खांब काढावे लागतील याची जाणीव असून सुद्धा बसवण्यात आले होते. त्याच गलथान कारभारामुळे गोडोली नाका ते अंजठा चौक दरम्यानच्या रस्त्याकडेचे विद्युत पोल आता काढावे लागत आहेत. हे सातारा विकास आघाडीच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा बाबाराजेंचे समर्थक रवी पवार यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
रवी पवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सातारा शहराची हद्दवाढ झाली. त्या हद्दवाढीमध्ये गोडोलीच्या त्रिशंकू भागासह विलासपूर, अजंठा चौकापर्यंतचा काही भाग आला. याच भागात स्ट्रीट लाईट गेल्या पाच महिन्यापूर्वी सुरु करण्याची खटपट केली. परंतु हे काम करत असताना सातारा विकास आघाडीला हे पोल रस्ता रुंदीकरणात काढावे लागणार आहेत हे ज्ञात असावे. आता हे काम सुरु असून सातारा विकास आघाडीचा उजेड रस्ता रुंदीकरणात अडसर ठरु लागला. त्यामुळे भोंगळ कारभाराचे एक चांगले उदाहरण समोर येत आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.