स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांची मागणी
सातारा / प्रतिनिधी :
तारळे भागातील शेतकऱ्यांच्या भोळ्या भाबड्यापणाचा गैरफायदा घेऊन ज्या पुढाऱ्यांनी फसवणूक केली. त्या पुढाऱ्यांची सखोल चौकशी करून संबधित भामट्या पुढाऱ्यांना जेलमध्ये टाकावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह पिढीतांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ यांच्यासह पीडित शेतकरी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुक्यातील तारळे भागात 2010 मध्ये शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतो अशी बतावणी करून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. कागदपत्रे घेऊन त्यावर कर्ज घेतले अन लगेच दुसऱ्या दिवशी संबंधित पुढाऱ्यांनीच काढले. त्या कर्जबाबत शेतकऱ्यांना माहिती नव्हती.
वन टाइम सेटलमेंटची नोटीस बँकेने पाठवल्यावर शेतकरी भयभीत झाले. दररोज शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भोळ्या भाबड्यापणाचा फायदा घेतला. त्यांची फसवणूक करणाऱ्या पुढाऱ्याची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, ज्या पुढाऱ्यांनी मायबाप शेतकऱ्यांना फसवले आहे, त्यांना कायदेशीर कारवाई करून जेलमध्ये टाकण्यात यावे, आणि शेतकऱ्यांच्या नावावरचे कर्ज त्यांच्याकडून वसूल करावे, बँकेच्या तत्कालीन अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.