गोडोली / प्रतिनिधी :
अतिक्रमणाचा विळखा पडलेल्या साईबाबा चौकातील सततची वाहतूक कोंडी ‘तरुण भारत’ ने चव्हाट्यावर आणली. त्यानंतर पालिकेने गेले दोन दिवस झाले ते हटवण्यासाठी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. वाहतूकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण संबंधितांना काढून घेण्यास सांगितले. यावेळी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकारी आणि पालिका कर्मचारी यांच्यात ‘तु-तु मै-मै’ होत असताना पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेलार यांची इंट्री होताच अतिक्रमण काढून घ्यायला सुरुवात झाली.
सातारा शहराच्या प्रवेशद्वारात असणाऱ्या साईबाबा चौकात हातगाडे, भाजी विक्रेते यांना वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण केले आहे. यावर ‘तरुण भारत’ने दि. 6 जानेवारी रोजी सडेतोड बातमी प्रसिद्ध केली होती. यावर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाला रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून आधी सुचना देत शनिवारी थेट कारवाईला नगरपालिकेची यंत्रणा आली असता हॉकर्स संघटनेने किरकोळ आक्षेप घेतला असता नुकसान न करता सबुरीने घेत ते हटवा, यावरून जिल्हा उपाध्यक्ष सादिक पैलवान, कार्याध्यक्ष संदीप माने, शहराध्यक्ष संजय पवार यांच्याशी कर्मचाऱ्यांचे ‘तु-तु मै-मै’ झाले.
अतिक्रमणाचा प्रश्न सतत चिळघत असतो. पालिकेने ते हटविण्यासाठी मोहीम सुरू केली की फोनाफोनी होऊन ती थांबवली जाते. मात्र, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी, सध्या वाहतुकीला अडथळा ठरणारे या चौकातील सर्व अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे तभाला सांगितले.तर हॉकर्स संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने यांनी, हॉकर्स झोन निश्चित करण्याचा न्यायालयाचा आदेश असूनही पालिकेने तो अद्याप केला नाही. हॉकर्स संघटनेला विश्वासात घेऊन कारवाई करावी, सतत त्रास देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.