गाडय़ा योग्य पद्धतीच्या असल्या तर त्या गाडय़ातून कचरा गोळा करणार
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील घरोघरी कचरा गोळा करणाऱया ठेक्याची मुदत संपली होती. नव्याने ठेका बोलवण्यात आला होता. परंतु अल्प प्रतिसाद व आलेल्या ठेकेदारांची कागदपत्रे अपूर्ण असायची. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करुन भगवते या कपंनीने ठेका घेतला आहे. अद्यापही ठेका चालवण्यास सुरुवात केलेली नसून घंटागाडय़ा सुस्थितीत आहेत का?, हे तपासूनच घंटागाडय़ा तपासून काम सुरु करणार असल्याचे समजते. दरम्यान, अनेक घंटागाडय़ांची समस्या असून त्याकडे दुर्लक्ष आहे.
शहरातील कचरा गोळा करण्यासाठी पालिकेच्या घंटागाडय़ा या ठेकेदाराकडून चालवून कचरा व्यवस्थापन राखण्यात येते. दररोज सुमारे दहा मेट्रीक टन कचरा गोळा करुन सोनगाव कचरा डेपोत टाकण्यात येतो. वर्षांचा करार असल्याने त्यानुसार नव्याने टेंडर प्रकिया राबवण्यात येते. यावर्षी तब्बल सहा ते सात महिन्यांची मुदतवाढ ठेकेदाराला मिळाली होती. सुरुवातीला काढलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये प्रतिसादच मिळाला नाही तर दुसऱया वेळेला समिक्षा आणि भवगते या दोन कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये समिक्षा या कंपनीची कागदपत्रे अपूर्ण असल्याची कारणे दाखवत त्यांना त्या प्रक्रियेतून वगळून भगवते या कंपनीला ठेका दिला आहे. दोन दिवसांपूर्वी याची प्रक्रिया सातारा पालिकेत पार पडली. परंतु अजूनही जुन्या ठेकेदाराकडून काम सुरु आहे. नव्याने घेतलेल्या कंपनीकडून पालिकेच्या वाहनांची कंडीशन तपासूनच मग त्या ताब्यात घेऊन काम सुरु करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, अनेक घंटागाडय़ाची समस्या असून त्याबाबत नेमकी काय कार्यवाही होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कामगारांचा प्रश्न चिघळण्याची शक्यता
जुन्या ठेकेदाराकडून घंटागाडीवरील कर्मचाऱयांचे पीएफचे पैसे वेळेवर भरले नाहीत. कमी पगारात काम करवून घेतले. त्यामुळे घंटागाडी कर्मचारी आणि ठेकेदार यांच्यामधील वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.