प्रतिनिधी / सातारा :
कोरोना महामारीचे संकट असताना सातारा तालुका व शहरातील कोणताही नागरिक भूक बळी ठरू नये याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्यावतीने धान्य पाठवून दिले होते. सातारा तालुक्यातील 95 हजार रेशन कार्डधारकांना दिलेल्या सूचनेप्रमाणे वाटप करण्याचे आदेश असताना काही रेशन दुकानदार यांच्या तक्रारी ‘तरुण भारत’च्या माध्यमातून मांडल्या गेल्या. सातारा शहर व तालुक्यातील 51 दुकानांची सातारा तहसीलदार आशा होळकर यांच्या आदेशानुसार पथकाने तपासणी केली. पाच दुकानावर कारवाई करण्यात आली आहे.
सध्याचे कोरोनाच्या संकटात प्रत्येकाला रेशन धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना मोफत धान्य देण्याचे म्हटले होते. त्यानुसार सातारा तालुक्यात अंत्योदय योजनेची व दारिद्रय़ रेषेखालील 65 हजार कार्डधारक आहेत तर 30 हजार इतर कार्डधारक आहेत. रेशन धान्य आल्यानंतर वाटप सुरू झाले पण दिलेल्या सूचनेनुसार वाटप करा असे आदेश सातारा तहसीलदार आशा होळकर यांनी दिले होते. काही दुकानदारांनी मनमानी पद्धतीने वाटप सुरू केले. त्याबद्दल ‘तरुण भारत’ने आवाज उठवला.
तहसीलदार आशा होळकर यांच्या सूचनेनुसार सातारा शहर व तालुक्यातील 51 रेशन दुकानाची तपासणी करण्यात आली. या पथकात नायब तहसीलदार आबास सय्यद, अव्वल कारकून संतोष दळवी आदींचा समावेश होता. कारवाई झालेल्यामध्ये प्रतापसिंहनगर येथील सी. एम. लंकेश्वर, अंबवडे बु येथील एस. एम. पिलावरे, देगाव येथील डी. जी. सावंत, श्रीमती एन. पी. सावंत आणि सातारा शहरातील मल्हारपेठ येथील पी. वाय. तपासे या पाच दुकानदारांनी ग्राहकांना कमी धान्य व पावती न देणे, धान्यात आढळून आलेली तफावत, कमी धान्य देणे असे प्रकार आढळून आले असून त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे समजते.
सातारा तहसीलदार यांच्याकडून आवाहन
केंद्र शासनकडून आलेल्या अंत्योदय व केसरी (प्रधान्य कुटुंब लाभार्थी) यांना शासनकडून प्रधानमंत्री गरीब कल्याणकारी योजनेमार्फत मोफत तांदूळ वाटप आहे. हे फक्त ऑनलाईन फीडिंग असलेल्या 12 अंकी नंबर असलेल्या कार्डसाठीच आहे. तसेच ग्रामीण भागातील केसरी (प्राधान्य कुटुंब लाभार्थी) या योजनेत सामाविस्ट असलेल्या कार्डाचे वार्षिक उत्पन्न हे जास्तीत जास्त 44 हजारपर्यंत असावे लागते. इतर सर्व केशरी कार्ड ही एपीएल या योजनेत मोडतात. या योजनेकरता वार्षिक उत्पन्न हे 45 हजार ते 99 हजार एवढे असावे लागते. एपीएलसाठी राज्य शासनकडून लवकरच प्रति व्यक्ति 5 किलो धान्य गहु 8 रुपये किलो व तांदूळ 12 रूपये प्रति किलो दराने देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे. इतर सरकारी आणि नीम सरकारी तसेच पेन्शनधारक यांचा समावेश हा पांढऱया कार्डमध्ये करण्यात येतो. या कार्डसाठी कोणतेही धान्य शासन देत नाही. याची सर्वानी नोंद घ्यावी. ऑनलाइन फीडिंग नसले कार्डधारकानी दुकानदारासोबत वाद घालु नये. तसेच कोणाचे केशरी कार्ड असलेल्या कार्डाचे ऑनलाइन फीडिंग राहिलेले असल्यास लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व कागदपत्र पडताळून फीडिंग केले जाईल, असे आवाहन सातारा तहसील कार्यालयातून करण्यात आले आहे.