ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ज्या गावांमध्ये अद्याप मोबाईल कनेक्टिविटी नाही, अशा सात हजारांहून अधिक गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारुन 4 जी सेवा पुरविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
अनुराग ठाकूर म्हणाले, आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशाच्या 44 जिह्यांमधील जवळपास सात हजारांहून अधिक गावांमध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून या गावांना 4 जी सुविधा उपलब्ध होईल. या योजनेसाठी जवळपास 6466 कोटी रुपये खर्च होणार आहेत. याशिवाय ग्रामीण आणि दुर्गम भागांना रस्त्यांशी जोडण्यासाठी पंतप्रधान ग्रामीण सडक योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून देशातील गावे रस्त्यांद्वारे जोडली जाऊ शकतील. यासाठी जवळपास 33,822 कोटी खर्च अंदाजित आहे.