अध्याय अकरावा
साधुलक्षणांविषयी बोलताना भगवंत म्हणाले, साधूंचे चौदावे लक्षण म्हणजे ‘मितभोजन’, मितहारी जिव्हेच्या इच्छेला बांधला जात नाही, क्षुधेच्या तावडीत कधी सापडत नाही आणि आवडीनिवडीच्या भरीस न पडता तो भोजनाला तयार असतो. मितभोजी साधु प्रत्येक घास श्रीकृष्णाशी समरस झाला आहे असे मानून सारे जेवूनही न जेवलेला असा असतो. साधूचे स्थैर्य अनेक द्वंद्वांचा संभार प्राप्त झाला असताही भंग पावत नाही. त्याचप्रमाणे उच्च-नीच अशा नानाप्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या किंवा मोहममता कितीही दाटून राहिल्या, तरी ज्याच्या चित्ताला क्षोभ म्हणून उत्पन्न होत नाही, त्याचेच नाव आत्मशांति. हे परस्परलक्षण हाच संतांचा पंधरावा गुण होय. जेथे मीपणा नसतो तेच आपल्या पूर्वजांचे मूळ घर होय. तेथेच साधूचे मन स्थिरावलेले असते त्या स्थितीला ‘स्थिरता’ असे नाव दिले आहे. आपला जो आश्रम असेल तोच चारही आश्रमांहून उत्तम होय असे समजून तेथेच मनोधर्म स्थिर करून ब्रह्माच्या ठिकाणीच ज्याचे मन स्थिरावते, त्याच त्याच्या स्थितीला स्थिरता हे नाव देता येईल. अशा स्थिरतेमुळे साधू स्वसरूप जाणून असतो. म्हणून तो स्थिरतेच्या बळावर स्वस्वरूपानेच स्वकर्म करणे, स्वस्वरूपानेच वर्णाश्रम चालविणे व स्वस्वरूपानेच स्वधर्म पाळणे हे सहजी करू शकतो. तेव्हा उद्धवा जीवनात कोणत्याही परिस्थितीत जो स्थिर राहू शकतो तोच स्वसरूप जाणतो. आता ‘मला शरण येणे’ हे सोळावें लक्षण आहे त्याविषयी सांगतो. नदी समुद्राला शरण आली तर ती त्याच्याशी एकरूप होऊन समुद्रस्वरूप होते. त्याप्रमाणे जी वृत्ती मला शरण आली, ती मत्स्वरूपच झाली असे समजावे. मीठ पाण्याला शरण आले की तत्काल त्याचे पाणीच होते त्याप्रमाणे मला जो अनन्यभावाने शरण येतो तो मीच होऊन राहतो हे लक्षात ठेव. पण मला शरण येऊन जो मानसन्मानाची किंवा कीर्तीची इच्छा करतो, तो गुळातला खडा समजावा. गुळाने जो दगड माखलेला असतो, तो वरून गोड दिसतो. पण शेवटी शिजविताना त्याचे खरे स्वरूप कळते. त्याप्रमाणे जो वरवर माझे भजन करतो आणि मनात विषयाचा अभिलाष धरतो, तो काही मला अनन्यभावाने शरण आलेला नसतो. त्याला लोभाचा मोठा कलंक लागलेला असतो. एखादी कन्या सर्व अंगांनी सुंदर व सुरेख आहे परंतु तिच्या नाकावर मात्र पांढरा कोडाचा डाग असेल तर तिला जसा कोणी सुज्ञ मनुष्य वरणार नाही त्याप्रमाणेच माझ्या भजनात विषयलोभ हा दोष आहे हे लक्षात ठेव किंवा ज्याप्रमाणे ओकलेली ओक अतिनिंद्य समजतात, त्याप्रमाणेच विषयांचा अभिलाषही अत्यंत निंद्य आहे.
त्रैलोक्मयाच्या साम्राज्यवैभवाचा तिरस्कार करून जो मला शरण येतो, त्याचे आणि माझे ऐक्मय होऊन तो मीच होतो असे समज. मग त्याला मानापमान कशाचा? ह्याचे नाव मला शरण येणे. उद्धवा! हे सतरावे लक्षण होय हे लक्षात ठेव. आता जो ‘मनन’ गुण आहे तो ऐक. वेदशास्त्रांचे निरूपण व गुरुवाक्मयाचे निरूपण ऐकले असता किंवा अद्वैताचे श्रवण केले असता, त्या सर्वांचा युक्तीने साधकबाधक प्रमाणांनी आपल्याच मनाशी वारंवार विचार करणे त्याचे नाव ‘मनन’ गुण.
अग्नि आणि कापूर ह्यांची भेट झाली असता तो कापूर खरोखर अग्निरूपच होतो, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपात मन ठेवले असता ते मनच चित्स्वरूप होऊन जाते. मननाच्याच सामर्थ्याने मन जेथपर्यंत जाऊ पाहते, तेथपर्यंत त्याच्याबरोबर मीच असतो, किंवा ते न जाता स्थिर राहिले तरी तेथेही मी असतोच. दिवा जिकडे जाऊन बसेल तिकडे त्याचा प्रकाश असतोच किंवा तो कोठेही न जाता जागच्या जागी बसला तरी तेथेही प्रकाश असतोच. त्याप्रमाणे माझे मनन करताना मन गप्पच झाले म्हणजे मग ते कोठेही गेले किंवा गेले नाही तरी त्याची मद्रुपता मोडत नाही. अशा प्रकारे माझे जे केवळ शुद्ध स्वरूप आहे, तेथे ज्याचे मन मत्स्वरूपाने स्थिर होऊन ध्रुवाप्रमाणे अढळ राहते त्याला ‘मननशील’ असे म्हणतात. ‘मुनि’ या शब्दाचा अर्थ मननशीलता असाच आहे हे लक्षात ठेव. हेच साधूचे अठरावे लक्षण होय.
क्रमशः