अनलॉक-4 चे दिशानिर्देश जाहीर : 7 सप्टेंबरपासून मेट्रो धावणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने अनलॉक-4 संबंधीचे दिशानिर्देश शनिवारी संध्याकाळी जाहीर केले आहेत. अनलॉक-4 मध्ये 7 सप्टेंबरपासून देशभरातील मेट्रोरेल्वे कालबद्ध पद्धतीने धावू लागणार आहे. 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमही आयोजित करता येणार आहेत. परंतु यात कमाल 100 जणांना सामील होण्याची अनुमती असेल.
अंतर्गत आणि आंतरराज्य प्रवासावर आता कुठलीच बंदी नसणार आहे. कुणालाही देशात कुठेही जाण्यासाठी स्वतंत्रपणे अनुमती घेण्याची गरज भासणार नाही. सर्वांना राष्ट्रीय पातळीवर देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे. दुकानांवर ग्राहकांदरम्यानही सोशल डिस्टन्सिंग बाळगणे अनिवार्य आहे. याप्रकरणी गृह मंत्रालय देखरेख ठेवणार आहे.
गृह मंत्रालय आणि केंद्रीय शहरी विकास मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यातील चर्चेनंतर टप्पाबद्ध पद्धतीने मेट्रो सेवा सुरू होणार आहे. कोरोना महामारीमुळे 22 मार्चपासून मेट्रो सेवा बंद आहे. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे (काही विशेष प्रकरणे वगळता) अद्याप बंदच राहणार आहेत.
65 वर्षांवरील लोक, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, गरोदर महिला, अन्य घातक आजारांना तोंड देत असलेल्या लोकांना शक्यतो घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्य सरकारना आता केंद्र सरकारच्या अनुमतीशिवाय स्थानिक पातळीवर टाळेबंदी लागू करता येणार नाही. केवळ कंटेन्मेंट झोनमध्येच टाळेबंदी लागू करता येणार आहे.
कार्यक्रमांना अनुमती
सरकारच्या निर्देशांनुसार ओपन एअर थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरू करता येणार आहे. तर मर्यादित संख्येतील सभेत लोकांना फेसमास्क परिधान करणे, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. उपस्थित लोकांची थर्मल स्क्रीनिंग केली जाणार असून हँडवॉश आणि सॅनिटायजर उपलब्ध करावे लागणार आहे.
शाळा-महाविद्यालये बंदच
सरकारच्या दिशानिर्देशांनुसार 30 सप्टेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये बंदच राहणार आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करण्यात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षण पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत शिक्षक आणि बिगरशिक्षक कर्मचाऱयांना शाळांमध्ये बोलाविले जाऊ शकते. ऑनलाईन शिक्षण, टेलिकौन्सिलिंगशी संबंधित कार्ये त्यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. कंटेन्मेंट झोनबाहेरील 9 ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थी स्वतःच्या कुटुंबाच्या सहमतीनंतर शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत जाऊ शकतात. परंतु याकरिता पालक/आईवडिल यांची लेखी सहमती असणे आवश्यक आहे.