कोरोना पॉझिटिव्हचे मुंबई कनेक्शन पुनःपुन्हा स्पष्ट : जिल्हय़ात आलेल्या मुंबईकरांची संख्याही 50 हजाराच्या घरात
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाने दोन महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱयापैकी यश मिळविले खरे, मात्र कोरोना पॉझिटिव्हचा आकडा आठवरून एकदम सोळावर पोहोचला आणि मोठय़ा संकटाची भीती व्यक्त होऊ लागली. पॉझिटिव्हमधील बहुतांश रुग्णांचे ‘मुंबई कनेक्शन’ असल्याचे पुनःपुन्हा स्पष्ट झाले. त्यात आता सिंधुदुर्गात पोहोचलेल्या चाकरमान्यांचा आकडा 50 हजाराच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे कसोटीचा काळ आता खऱया अर्थाने सुरू झाला आहे.
दोन महिन्यात आठ आणि पुढील अवघ्या दोन दिवसांत नऊ रुग्ण सापडल्याने प्रशासनाचा खऱया अर्थाने आता कस लागणार आहे. दोन महिन्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठवरच होती, तेव्हा जिल्हय़ात जिल्हय़ाबाहेरून लोक येत नव्हते. विशेषत: कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मुंबईतून चाकरमानी आले नव्हते. परंतु 10 मेनंतर जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांची संख्या वाढली. हा आकडा 50 हजारापर्यंत पोहोचला. त्यामुळे रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातील स्थितीही नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती वाढली. जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. अगदी जिल्हय़ाबाहेरून येणाऱयांना पूर्वसंमतीशिवाय ई-पास पास देऊ नये, असे पत्र राज्यातील इतर जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्तांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱयांना पाठवावे लागले. या पत्राचा चांगला उपयोग झाल्याचे दिसत आहे. सरसकट ई-पास देणे बंद झाले आणि चाकरमान्यांचा जिल्हय़ात येण्याचा ओघही काहीसा थांबला आहे.
मुंबई कनेक्शन पुनःपुन्हा
परंतु हे सर्व होईपर्यंत जिल्हय़ात 50 हजार चाकरमानी दाखल झाले आणि त्यांच्यामधूनच आता कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सापडलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई, तर दोन रुग्ण रत्नागिरीतील लांजा येथून आले आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्णांचे मुंबई कनेक्शनच असल्याचे स्पष्ट होत आहे.
स्वॅब कनेक्शन वाढविले पाहिजे
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना नमुना तपासणीसाठी लॅब नाही. कोल्हापूर किंवा मिरज येथे तपासणीला नमुने पाठवले जातात. परंतु तिथेही कामाचा व्याप मोठा असल्याने कोरोना तपासणी नमुन्यांचा अहवाल येण्यास उशीर होत असून त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढत आहे. अहवाल वेळीच आला, तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकतात. परंतु, जेवढा उशीर लागेल तेवढा संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोना नमुना तपासणी रोजच्या रोज होऊन त्याचे रिपोर्टही लगेच येणे आवश्यक आहे. स्वॅब कलेक्शनही वाढविले पाहिजे. काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणेही दिसत नाहीत. तरीही ते कोरोना बाधित असू शकतात. आतापर्यंत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या बाबतीत दोन-चार रुग्ण सोडले, तर कोरोनाची लक्षणेच कुणामध्ये दिसत नव्हती. त्यामुळे जिल्हय़ात स्वॅब कलेक्शन वाढविले व त्याची जलद तपासणी करून घेणे आवश्यक आहे. तरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जाता येईल.
भीती रुग्ण वाढीची
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये काही संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल येईपर्यंत जे तीव्र संशयित आणि सौम्य संशयित आहेत त्यांना एकत्रितच ठेवले जाते. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना वेगळे केले जाते. तसे न करता तीव्र व सौम्य संशयित रुग्णांना वेगवेगळय़ा कक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच संसर्ग वाढणार नाही, तसेच आयसोलेशन वॉर्डमधील कर्मचाऱयांनाही पीपीई कीट देणे तसेच त्यांना कोणाच्या संपर्कात येऊ न देण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हय़ात दोन महिन्यात आठ, दोन दिवसात नऊ आणि पुढील आठ दिवसात शंभरी गाठायलाही वेळ लागणार नाही. त्यासाठी जिल्हय़ाबाहेरून आलेल्या चाकरमान्यांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची तेवढीच गरज आहे.