मयत सिद्धीच्या कुटुंबियांचा दावा
गिरीश मांद्रेकर/ म्हापसा
आमच्या सिद्धीचे मरण पाण्यात बुडून नव्हे तर तिचा कुणीतरी अज्ञातानी खूनच केला आहे. आता आम्हाला सिद्धी मिळणारच नाही निदान मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना याबाबत सखोल चौकशी करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी सिद्धीच्या पालकांनी ‘तरुण भारतशी’ बोलताना दिली. शनिवारी दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व स्थानिक आमदार ग्लेन टिकलो सौझा यांनी सिद्धीच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व सिद्धीच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती कुटुंबियांना दिली.
आमची सिद्धी खूप हुशार होती. आपण तिला कामासाठी जाण्याकरीता दररोजच्याप्रमाणे म्हापसा ग्रीन पार्क येथे सोडून आलो होतो. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. त्या रात्री ती आपल्या मावस बहिणीबरोबर खेळत होती. लहान बहिणीनी तिचा मोबाईल खेळण्यासाठी घेतला असता चार्जिंग संपली त्यामुळे सकाळी उठून चार्ज करण्यासाठी लावलेला मोबाईल ती जातेवेळी घरीच विसरून गेली. तिचे प्रेमसंबंध आदी काहीच नव्हते. नाहक तिची कुणी बदनामी करू नये. आपण तिची बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास म्हापसा पोलिसात गेलो असता पोलिसांनी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. जर पोलिसांनी त्याचवेळी आम्हाला सहकार्य केले असते तर तपास योग्यरितीने झाला असता, असे सिद्धीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
म्हापसा पोलिसांनी तक्रारीकडे केले दुर्लक्ष
आपण सकाळी 9.30 वा. ग्रीनपार्क जवळ बसमध्ये बसविले असता 10 वा. फोन आला मॉल दि गोवामध्ये ती पोहचली नाही. नंतर आपण आपल्या मित्राला घेऊन पणजीत तिच्या शोधात गेलो. नंतर म्हापशात येऊन म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार देण्यास गेलो असता येथील डय़ुटीवरील पोलिसांनी ती आपल्या प्रियकराबरोबर गेली असेल असे सांगून दुपारी 3.30 वा. येण्यास सांगितले. आम्ही पुन्हा पोलीस स्थानकात गेलो. आम्ही पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली. उपाशीपोटी रात्री 8.30 वाजेपर्यंत आम्हाला तिथेच ठेवले. नंतर आम्ही तिला शोधायला जातो असे सांगून बाहेर पडलो. पोलिसांनी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
पंचनामा करतेवेळी आपल्यास का डावलले ?
अमलीपदार्थ प्रकरणात पोलीस धावतात. तेथे ते जास्त महत्त्व देतात मात्र माणसांना महत्त्व देत नाही. आज आमच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. 24 तासात सापडणार, असे पोलिसांनी सांगितले मात्र आज आपली मुलगी मरून गेली. बेवारस प्रमाणे पोलीस तो मृतदेह घेऊन गोमॅकोत शवचिकित्सेसाठी गेले असे सिद्धीचे वडील संदीप नाईक म्हणाले. आपण पोलीस स्थानकात येऊन मृतदेह कुठे अशी विचारणा केली असता आपल्यास बाहेर राहण्यास सांगितले. नंतर आपल्यास बांबोळी येथे नेले तेव्हा मुलीला पाहिले. ती सिद्धीच होती नंतर अर्ध्या तासातच पोलिसांनी बनावट जबाब घेऊन आपली फसवणूक केली. पोलिसांनी राज्यात चार खून पचविले आता ते पाचवे पचवायला पाहतात, असा आरोप संदीप नाईक यांनी केला. केवळ आज काँग्रेसने माझ्या मुलीच्या न्यायासाठी मोर्चा नेला.
न्यायासाठी उपोषणास बसणार
आम्ही सिद्धी नाईकच्या न्यायासाठी आझाद मैदानावर तसेच म्हापसा पोलीस स्थानकावर जाऊन विचारपूस करणार व सर्व कुटुंब न्यायासाठी आझाद मैदानावर उपोषणास बसणार असल्याची माहिती सिद्धीचे वडील संदीप नाईक यांनी दिली. आज आपल्याबरोबर अतिमहनीय व्यक्ती असता तर म्हापसा पोलिसांनी त्वरित कारवाई केली असती. आपण सामान्य असल्याने पोलिसांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी संदीप नाईक यांनी केला. खोटेपणा व लबाडीमुळेच व पोलिसांमुळेच आपल्या मुलीचा खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला.
मृत्यूबाबत गूढ कायम
पोलिसांनी काहीच कारवाई न करता आम्हाला काहीच न सांगता पोलीस मृतदेह घेऊन गेले. तिच्या अंगावर पिंक शर्ट व काळी पँट घातली होती. आम्ही फोन नंबर फोटो दिला होता. सिद्धीला कुणी मारले कुणी धरले याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही. ती अर्धी नग्न अवस्थेत कशी सापडली, मृतदेह किनाऱयावर कसा होता, 24 तासात कुठेतरी मृतदेह आढळायलाच पाहिजे होता. तिची पँट गायब होती तर हेअरबँड कशी तशीच राहील, तिच्या अंगावर वर्ण कसे आढळून आले या प्रश्नाचे पोलीस आम्हाला उत्तर देईल काय असे सवाल सिद्धीची मातोश्री संजना नाईक यांनी टाहो फोडत विचारले.
मुलींना सुरक्षा देणारे हेच काय ते सरकार ः नामदेव सोपटे
सिद्धीचा मावसा नामदेव ऊर्फ दादा सोपटे म्हणाले की, सिद्धी व आपली मुलगी दोघेही मॉलात कामास जात होती. सिद्धी पोहचली नसल्याने तिच्या वडिलांना मॉल मालकाने फोन केला. शोधाशोध केल्यानंतर म्हापशात पोलीस तक्रार दिली. पोलीस पाचवा खून पचवायला पाहत आहे. 24 तासात या मृत्यूचा पोलीस शोध घेऊ शकतात काय. आम्हाला पैसे नको आम्हाला सिद्धी आणून देतात काय? मुलींना सुरक्षा देणारे हेच काय ते सरकार काय, असा प्रतिसवाल त्यांनी केला.
बदनामीकारक वृत्त छापू नका
माझी मुलगी सिद्धी वैफल्यग्रस्त नव्हती. आमचे भांडणही होत नव्हते. तसे असते तर आपण तिला कामावरती पाठविली नसती. काही वृत्तपत्रांनी नाहक आमच्या विरोधात बदनामकारी वृत्त छापून आणले. आपण मुलीला मोबाईल विकत घेऊन दिला होता. तिचे कुणाशी प्रेमसंबंध नव्हते मग तिला कुणी मारले हे प्रश्नचिन्ह असून सिद्धीच्या मृत्यूची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे सिद्धीचे वडील संदीप म्हणाले.
या प्रकरणात राजकीय हात
या प्रकरणात राजकीय हात असण्याची शक्यता सिद्धीचा मावसा लक्ष्मण यांनी व्यक्त केली. त्याचे नाव बदनाम होईल म्हणून ते हे प्रकरण लपवू पाहत आहे, असा आरोप लक्ष्मण यांनी केला आहे.
सरकार कुटुंबियांच्या पाठिशी ः सदानंद तानावडे
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, सरकार मयत सिद्धीच्या कुटुंबियांच्या पाठिशी राहणार आहे. याबाबत सखोल चौकशी व्हायला पाहिजे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणी करणार आहोत. न्याय हा मिळायलाच पाहिजे. घरच्यांच्या म्हणण्यानुसार याबाबत पुन्हा सखोल चौकशी व्हायला पाहिजे.
गुन्हा अन्वेषण विभागाद्वारे चौकशी व्हावी ः आमदार ग्लेन टिकलो
आमदार ग्लेन टिकलो म्हणाले की, सिद्धीच्या मृत्यूमुळे गाव शोकाकूल झाला आहे. याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविणे गरजेचे आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत. याबाबत पुढे चौकशी होणे गरजेचे आहे. सिद्धीला न्याय मिळायलाच पाहिजे आणि आमचे मुख्यमंत्री हा न्याय मिळवून देणार आहे, असे टिकलो म्हणाले.
मुलींना राज्यात संरक्षण नाही ः सीमरन नाईक सिद्धीची बहीण सीमरन म्हणाली की, आज शिकून घरी बसावे काय. बसमधून मुली गायब होतात तर आम्ही काय करावे. आम्हाला कुणाचेच संरक्षण नाही. माझा वाढदिवस सिद्धीने मोठय़ा थाटात साजरा करण्याचे ठरविले होते व त्यादिवशी फिरायला जाऊया, असे ती म्हणाली होती. मात्र नियतीने आज तिलाच आमच्यातून हिरावून नेले. सिद्धी कधी आत्महत्या करणारच नाही, तिचा खूनच केला असल्याचा आरोप सीमरन हिने केला आहे.