लोकप्रतिनिधींनी शरद पवारांशी सीमाप्रश्नाच्या तोडग्यासाठी चर्चा करावी : खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी
प्रतिनिधी /कोल्हापूर
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कायमस्वरुपी योग्य तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी लोकप्रतिनिधींनी चर्चा करून शासनस्तरावर पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कोल्हापुरात खासदार धैर्यशील माने व आमदार चंद्रकांत जाधव यांना दिले. याप्रश्नी आवाज उठविण्यासाठी दि. 28 ऑक्टोबरला कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार धैर्यशील माने व आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, सीमावासीय जनता 1956 पासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहे. परंतु अद्यापही त्याला यश आलेले नाही. सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 2004 साली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु गेली 16 वर्षे झाली तरीही सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न एक इंचदेखील पुढे सरकलेला नाही. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती नष्ट व्हावी, यादृष्टीने अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच आपला मराठी माणूस हा व्याकुळ आणि चिंताग्रस्त झालेला आहे. सध्या सीमाभागातील परिस्थिती पाहता जशी कारवार, सुपा, हल्याळ भागातील मराठी भाषा, संस्कृती नामशेष झाली, तशी परिस्थिती बेळगाव व खानापूर सीमाभागातील होऊन मराठी भाषा व संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. नजीकच्या काळात या प्रश्नावर योग्य तोडगा निघाला नाही तर 65 वर्षे सुरू असलेल्या लढय़ात हुतात्मे झालेल्यांचे बलिदान व लोकशाहीमार्गाने दिलेले विविध लढेही वाया जाणार आहेत. तसे झाल्यास येणारी पिढी आम्हाला कदापिही माफ करणार नाही. तरी लोकप्रतिनिधी या नात्याने आपण या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तडजोडीने हा प्रश्न निकालात काढावा.
शिष्टमंडळात समितीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, सचिव आबासाहेब दळवी, शहर उपाध्यक्ष विवेक गिरी, खानापूर तालुका भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, अनंत चौगुले आदींचा समावेश होता.