बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई, फरारी आरोपींचा शोध जारी
प्रतिनिधी / बेळगाव
रिअल इस्टेट व्यावसायिक राजू मल्लाप्पा दोड्डबोमण्णावर (वय 41) या युवकाच्या खूनप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आणखी चौघा जणांना अटक केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या सातवर पोहोचली आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी मंगळवारी संजय चिन्नस्वामी रजपूत (वय 43, रा. कपिलेश्वर मंदिरा पाठीमागे), विजय शंकर जागृत (वय 35, रा. महाद्वार रोड) या दोघा जणांना अटक केली आहे. संजयला राजूच्या खुनाची सुपारी देण्यात आली होती.
बुधवारी सागर दुंडय्या हिरेमठ (वय 29, रा. भारतनगर, शहापूर), सर्वेश संदीप सपकाळ (वय 22, रा. शास्त्राrनगर) या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व चौघा जणांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सागर हा कार चालवत होता तर सर्वेशने मोटारसायकलवरून आणखी दोघा जणांना घेऊन राजूची कार अडविली होती. 15 मार्च रोजी सकाळी राजूच्या कारला मोटारसायकल धडकून त्याची कार अडविण्यात आली होती. त्यानंतर डोळय़ात मिरचीपूड टाकून त्याचा खून करण्यात आला होता.
सोमवारी राजूची पत्नी किरण दोड्डबोमण्णावर (वय 26, रा. टिळकवाडी), त्याचा मित्र धरनेंद्र घंटी (वय 52, मूळचा रा. हलगा-बस्तवाड, सध्या रा. ओमनगर, खासबाग), शशिकांत शंकरगौडा (वय 49, मूळचा रा. अलारवाड, सध्या रा. हिंदवाडी) या तिघा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी काही आरोपी अद्याप फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
10 लाखांची सुपारी देऊन रिअल इस्टेट व्यावसायिकाचा खून केल्याचे उघडकीस आले होते. सुरुवातीला तपास अधिकाऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणण्याचा आदेश आपल्या अधिकाऱयांना दिला होता. त्यामुळे या प्रकरणातील सत्य उजेडात आले.