कोरोना उदेकाच्या या कालखंडात अनेकांच्या कल्पनाशक्तीला घुमारे फुटल्याचे दिसून येत आहे. कोरोनाविरुद्धच्या संघर्षात आपलेही भरीव योगदान असावे, यासाठी अनेक जण अनेक अनोख्या कल्पनांना जन्म देत आहेत. फरिदाबाद जिल्हय़ातील एक मान्यवर पवन वर्मा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका चक्क सॅनिटायझरच्या बाटलीवर छापली. या बाटल्यांचे वाटप त्यांनी आपले नातेवाईक व इतरांमध्ये करून लग्नाचे अनोखे निमंत्रण दिले.
लग्नविधी आणि सप्तपदी झाल्यानंतर त्यांच्या घराण्याच्या परंपरेनुसार त्यांनी आपल्या जावयाला भेट दिली. ही भेटही नाविन्यपूर्ण होती. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी त्यांनी या भेटीत आपल्या जावयाला वडाचे एक रोप दिले. तसेच विवाहासाठी आलेल्यांना मिठाईऐवजी मास्कचे वाटप केले. यामुळे या विवाहाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. लग्नात त्यांची कन्या आणि जावई यांनी पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करण्याची शपथ घेतली. सध्याचे कोरोनाचे संकट हे पर्यावरणाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ओढवले आहे, असा पवन वर्मा व त्यांची पत्नी पूनम यांचा विश्वास आहे. त्यामुळे यापुढे तरी साऱयांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि स्वच्छता याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.