गटारी स्वच्छ केल्याचा मनपाचा दावा फोल : स्वच्छतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील गटारीचे बांधकाम करण्यासह स्वच्छता करण्यासाठी महापालिकेकडून कोटीचा निधी खर्च केला जातो. पण स्वच्छतेचे काम केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. सोमवार पेठेतील गटारीमध्ये कचरा साचला असून गवत उगवले असल्याने मनपाकडून गटारीची स्वच्छता केली जाते का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे गटार स्वच्छतेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार मनपाने चालविला असल्याची टीका होत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मनपाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याकरिता वर्षाला 25 कोटीचा निधी खर्च केला जातो. तरीदेखील स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गटारी स्वच्छतेचे काम नियमितपणे करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात येते. तसेच गटारी स्वच्छ करण्यासाठी चार वर्गवारी करण्यात आली असून रहिवासी वसाहत, वर्दळीचे ठिकाण आणि कचऱयाचे प्रमाण अशा विविध मुद्यावर गटारीची स्वच्छता करण्यात येते. काही ठिकाणाच्या गटारी दररोज, तर काही तीन दिवस, चार दिवस आणि आठ दिवसाआड स्वच्छ केल्या जातात. पण या वेळापत्रकाप्रमाणे स्वच्छतेचे काम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वेळापत्रकाप्रमाणे गटारी स्वच्छ केल्यास गटारी स्वच्छ दिसल्या असत्या. पण सोमवार पेठेतील गटारीत गवत उगवले असून कित्येक महिन्यापासून गटारी स्वच्छ करण्यात आल्या नसल्याची टीका नागरिक करीत आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली निधीचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
सोमवार पेठेतील गटारी स्वच्छ करण्यात आल्या नसल्याने गटारी कचऱयाने भरल्या आहेत. तसेच गवत उगवून टाकण्यात आलेला कचरा कुजला आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील गटारी स्वच्छ केल्याचा मनपा अधिकाऱयांचा दावा फोल गेला आहे. येथील गटारी स्वच्छ करण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.