बार्शी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी:
बार्शी नगरपालिकेचे समोर बार्शी शहरातील भुयारी गटार योजना, खराब रस्ते व इतर मागण्यासाठी गेली चार दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले राष्ट्रीय आंदोलन समन्वयक मनिष देशपांडे यांच्या आंदोलनाचा आज पाचव्या दिवशी बार्शी नगरपरिषद प्रशासन यांचेकडून कोणतेही ठोस उत्तर किंवा मागणी पूर्ण होत नसल्यामुळे बार्शी नगरपरिषद कर्मचारी व सत्ताधारी नगरसेवक यांचे गांधीगिरी स्टाईलने गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्याचे आंदोलन आयोजित केले होते. त्यापैकी आज सकाळी बार्शी नगरपरिषदेच्या गेटवर नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांची गाडी आल्यानंतर त्यांना या आंदोलनकर्त्यांनी गुलाबाचे फुल देऊन नगरपालिकेचे गेटवर स्वागत केले.
अचानक गांधीगिरी स्टाईल नगराध्यक्षांचे होणारे स्वागत ची प्रक्रिया पाहून नगरपालिकेच्या गेटवर एकच गर्दी पाहायला मिळाली तर याठिकाणी सुरक्षेला असणारे पोलीस कर्मचारी यांची अचानक धांदल उडाली याबाबत मनिष देशपांडे या आंदोलन कर्त्यास विचारले असता त्यांनी सांगितले की, बार्शीतील खराब रस्ते, भुयारी गटारी मुळे झालेले रस्त्यांचे नुकसान या कामामुळे उडणारी धूळ व विविध कामाच्या माध्यमातून जे लोक मृत्युमुखी पडले आहेत किंवा जखमी झाले आहेत अशांना नुकसान भरपाई बाबत उपोषणास बसलेले असताना नगरपरिषद प्रशासन केवळ दिशाहीन पत्र देत आहे. त्यामुळे बेमुदत आंदोलन तसेच चालू राहणार असून येथून पुढे विविध प्रकारची आंदोलने पार पाडली जातील असे दैनिक तरुण भारत संवाद शी बोलताना सांगितले. याबाबत नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.