प्रतिनिधी / करमाळा
तालुक्यातील ऊसावर पडणाऱ्या हुमनीची किड नष्ट करण्यासाठी तालुका कृषी कार्यालय व शेतकरी प्रयत्नशील असून, वेगवेगळ्या ठिकाणी हुमनी नष्ट करण्यासाठी ३३८ ट्रॅप लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी या कालावधीतच हुमनी नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी केले आहे.
करमाळा तालुक्यामध्ये ऊसाचे प्रमाण मोठे असून, गेल्या दोन वर्षापासून हूमनीची किड लागल्याने ऊसाचे उत्पादन घटत आहे. यासाठी तालुका कृषी कार्यालयाने योग्य नियोजन केले असून, प्रत्येक गावामध्ये हूमनी नष्ट करण्यासाठी ट्रॅप लावले आहेत. त्यानूसार आत्तापर्यंत करमाळा तालुक्यात ३३८ ट्रॅप लावले आहेत.
तालुक्यात आडसाली ऊस ५२४९ हेक्टर, पूर्व हंगामी ऊस ५७०० हेक्टर सुरू ऊस ५५०० हेक्टर, खोडवा ९४०० हेक्टर अशाप्रकारे २५ हजार ८४० हेक्टर ऊस उपलब्ध आहे. या ऊसावर विशेषत: खोडवा ऊसावर हूमनीचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. यासाठी या कालावधीत हूमनीचा नरभुंगा नष्ट करण्यासाठी ट्रॅक लावावा लागतो.
ट्रॅप कसा लावतात
हा ट्रॅप म्हणजे शेतात खड्डा घेऊन त्याच्यामध्ये प्लॅस्टीक कागद सोडून त्यात थोडेसे तेल टाकल्यानंतर या बिगरमोसमी पावसात हा नर उजेडात येतो व पाण्यात पडतो आणि पुढे मरतो. त्यानंतर पुढील प्रजनन वाढत नाही.
येत्या खरीप हंगामात ४६ हजार १५० हेक्टरवर पेरणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात तालुक्यामध्ये तूर, उडीद, मका, बाजरी ही पिके घेतली जातात. यानूसार तूर १४ हजार ५०० हेक्टर, उडीद १४ हजार हेक्टर, बाजरी व मका १० हजार हेक्टर तर मूग, सुर्यफुल , कापूस इ. ८ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. प्रत्येक शेतकऱ्याने सुरूवातीला बीज प्रक्रिया करूनच खरीप पेरणी करावी, असे आवाहनही प्रभारी तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी केले आहे.