तृणमूल काँग्रेसला पाठिंब्याबद्दल अद्याप निर्णय नाही
बंगालमध्ये काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या ‘मूड’मध्ये नाही. विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूलला बहुमत न मिळाल्यास ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देणार का असा प्रश्न पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना विचारण्यात आला होता. या काल्पनिक प्रश्नाचे आताच उत्तर देणे योग्य ठरणार नाही, कारण आमची नजर नवान्न (मुख्यमंत्री कार्यालय) वर केंद्रीत असून आम्ही त्याच दिशेने वाटचाल करत आहोत. ममता बॅनर्जी पराभूत झाल्यास कुठे जाणार हे आम्ही जाणत नाही. कारण राजकारण शक्यतांचा खेळ आहे. बंगालमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि इंडियन सेक्युलर प्रंट मिळून निवडणूक लढवत असल्याचे चोधरी यांनी म्हटले आहे.
बंगालमध्ये आतापर्यंत चार टप्प्यांमधील मतदान संपुष्टात आले आहे. पण राज्यात आतापर्यंत काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रचारासाठी आलेला नाही. पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बंगालमध्ये येऊ शकतात असे बोलले जात आहे. 6 एप्रिल रोजी बंगाल वगळता उर्वरित 4 राज्यांमधील मतदान संपुष्टात आले आहे.
राहुल गांधी यांची पहिली सभा मालदा आणि मुर्शिदाबाद किंवा सिलीगुडीमध्ये होऊ शकते. राहुल गांधी यांनी आतायर्पंत केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये काँग्रेसचा प्रचार केला आहे, पण बंगालमध्ये ते एकदाही आले नाहीत. याचबरोबर प्रियंका वड्रा तसेच अन्य काँग्रेस नेतेही बंगालपासून दूरच राहिले आहेत.
राजकीय हतबलता तसेच उपस्थित होणाऱया प्रश्नांपासून वाचण्यासाठी राहुल गांधी बंगाल दौरा टाळत राहिल आहेत. एकीकडे डाव्या पक्षांसोबत बंगालमध्ये मिळून काँग्रेस निवडणूक लढत आहे. तर केरळमध्ये दोघेही परस्परांचे मुख्य विरोधक आहेत. तर ममता बॅनर्जी यांना भाजपविरोधात बळ देण्यासाठीही काँग्रेस नेतृत्वाने बंगालमध्ये जाणूनबुजून मोठा प्रचार केला नसल्याचीही वदंता आहे.