नक्षलवाद, हिंसाचाराशी संघर्ष करण्याचा फॉर्म्युला निश्चित
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या 56 व्या डीजीपी-आयजीपी परिषदेचा रविवारी समारोप झाला. या तीन दिवसीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांतील पोलीस संघटनांना संबोधित केले. देशाच्या पोलीस दलाच्या हितासाठी इंटरऑपरेबल तंत्रज्ञानाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला. आता गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उच्च क्षमतेचे पोलीस तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येणार असल्याचे सुतोवाचही पंतप्रधानांनी केले.
डीजीपी परिषदेत अंतर्गत सुरक्षेसोबतच दहशतवाद, सायबर गुन्हे, किनारी सुरक्षा, नक्षलवाद, अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या विविध मुद्दय़ांवर विचारमंथन झाले. त्याचबरोबर राज्यांच्या पोलीस आणि तपास यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्याचा पुनरुच्चार करण्यात आला. यामध्ये देशभरातील 350 हून अधिक वरि÷ अधिकारी विविध राज्यांतील आयबी कार्यालयांशी व्हर्च्युअल माध्यमातून जोडले गेले. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात परिषद आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आयोजकांचे कौतुक केले.
2014 पासून देशाच्या विविध भागात डीजीपी-आयजीपी परिषदेचे आयोजन केले जात आहे. 2014 मध्ये लागू करण्यात आलेले स्मार्ट पोलिसिंग अधिक मजबूत करण्यावर केंद्र सरकार भर देणार आहे. पोलिसांत उच्च तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना स्मार्ट पोलिसिंगशी जोडण्याचा सल्ला पंतप्रधानांनी उच्चाधिकाऱयांना दिला. तंत्रज्ञान हे सर्वसामान्यांच्या जीवनात महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे. युपीआय, कोविड ऍपचीही उदाहरणे देण्यात आली. तपास आणि देखरेखीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी देशभरातील डीजीपींनी केले सादरीकरण पाहिले. त्यानंतर पोलिसांना तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संसाधने उपलब्ध करून दिली जातील, असे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले. बदलत्या गरजांनुसार विभागीय कर्मचाऱयांना प्रशिक्षण द्या, असेही त्यांनी सुचविले.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर सूचना
प्रत्येक घटनेचे विश्लेषण आणि शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. देशाच्या पोलीस दलाच्या हितासाठी इंटरऑपरेबल तंत्रज्ञान वाढवण्यावर त्यांनी भर दिला. कारागृह सुधारणा, दहशतवाद, कट्टरतावाद, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, स्वयंसेवी संस्थांना परदेशी निधी, सीमावर्ती गावांचा विकास यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेवर चर्चा झाली. त्यासाठी पोलीस महासंचालकांचे कोअर ग्रुप तयार करण्यात आले.
कोविड महामारीच्या काळात पोलिसांच्या चांगल्या वागणुकीचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी इंटेलिजन्स ब्युरोच्या कर्मचाऱयांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले. यावेळी अनेक राज्यातील आयपीएस अधिकाऱयांनी सुरक्षेच्या मुद्यांवर आपले विचार मांडले.