प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर पी. के. क्वॉर्टर्स येथे स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामे हाती घेण्यात आली. दोन-तीन महिन्यांपूर्वी येथील रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात आले. त्यानंतर बऱयाच दिवसांनी पेव्हर्स बसविण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. मात्र आता कित्येक आठवडे उलटून गेले तरी स्मार्ट सिटीचे काम अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले आहे. येथील अर्धवट विकासकामांचा फटका नागरिकांना बसत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील रस्त्याच्या बाजूने पेव्हर्स बसविले आहेत. मात्र हे पेव्हर्स काही ठिकाणी न बसविल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर पेव्हर्स रस्त्याच्या बाजूने विखुरले असल्याने नागरिकांना समस्या निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी हे पेव्हर्स दिसत नसल्याने बरेच नागरिक अडकून जखमी होत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीची अपूर्णावस्थेत ठेवण्यात आलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.